नवी मुंबई : तुर्भे, सानपाडा, जुईनगर, वाशी विभागातील विभागातील विविध नागरी समस्यांसंदर्भात गुरुवारी मनसेकडून राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली ‘बोंबा मारा मोर्चा’ काढण्यात आला.
गुरुवारी सकाळी ११.३० वाजता सानपाडा येथील वेस्टर्न कॉलेजपासून मनसेच्या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘अधिकारी झोपा काढत राहिले, परप्रांतीयांनी फुटपाथ, रस्ते बळकावले’ अशा घोषणा यावेळी मोर्चात देण्यात आल्या. या मोर्चात विभागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण – महिला, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तुर्भे, सानपाडा, जुईनगर, वाशी विभागातील विविध नागरी समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. नवी मुंबई मनपा अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे सातत्याने कानाडोळा करत असल्याने नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाच्या कारभारा विषयी मोठा संताप निर्माण झाला आहे. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. पुढील १५ दिवसांत नागरी समस्या सोडविल्या नाहीत तर मनपाच्या विभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मनसेचे राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना दिला. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात मनसेचे राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, शहर सचिव विलास घोणे, शहर सहसचिव अभिजीत देसाई, दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, चंद्रकांत मंजुळकर, विकास पाटील, अक्षय भोसले, महिला उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, महिला उपशहर अध्यक्षा दिपाली ढऊळ यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सानपाडा सेक्टर ७ येथील कै. सीताराम मास्तर उद्यान सकाळी ११ वाजता बंद करण्यात येते. सानपाडा विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बंद होण्याची वेळ वाढवून ती दुपारी १२.३० वाजेपर्यंत करण्यात यावी, सानपाडा विभागातील रस्ते तसेच पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. त्यामुळे विभागातील नागरिकांना रस्ते तसेच पदपथावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या अनधिकृत फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी कारवाई करून येथील रस्ते व पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे करण्यात यावेत, सानपाडा विभागात बऱ्याच ठिकाणी रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळून व घसरून वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे सानपाडा विभागातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत, सानपाडा विभागात परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी मोठा हैदोस घातला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते व पदपथ खराब झालेले आहेत. या परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे सानपाडा विभागातील स्थानिक आगरी कोळी बांधवांचा पारंपरिक मासे विक्रीचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर तातडीने कायमस्वरूपी कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा मनसेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी यावेळी मनपा अधिकाऱ्यांना दिला.
सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट सुरू आहे. सानपाडा विभागात बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे घरफोडी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, नागरिकांना धमकावणे असेच अनेक गुन्हेगारीच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे या बाहेरून आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर ताबडतोब कायमस्वरूपी कारवाई करण्यात यावी, सानपाडा सेक्टर २ येथील वात्सल्य ट्रस्ट समोरील ब्रिजखाली नवी मुंबई मनपाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम रखडले आहे. हे काम रखडल्याने सदर ठिकाणी गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. त्याचा विनाकारण त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावावे तसेच शाळा, महाविद्यालय, दवाखाने आणि रुग्णालय या परिसरात रस्ते आणि पदपथावर दररोज जमा होणारा कचरा वेळेत उचलण्यात यावा, बऱ्याच ठिकाणी पदपथाची दुरवस्था झालेली असून गटारांची झाकणे गायब झालीत. यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी योगेश शेटे यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे यावेळी केली.
नवी मुंबईत वायू प्रदूषणात लक्षणीय वाढ झालेली आहे. आतापर्यंतचा नवी मुंबईचा वायू प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक काढला तर सानपाडा विभागाचा पहिला क्रमांक लागतो. सध्या सानपाडा विभागाचा वायू प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक १५९ आहे. सानपाडा विभागात जोरात सुरू असलेली बांधकामे, पुनर्विकास प्रकल्प, धुळयुक्त खराब रस्ते, एमआयडीसीतील कारखान्यातून सोडण्यात येणारा रासायनिक दर्प असलेला धूर आदी कारणांमुळे हवेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत आहे. यावर तातडीने उपाय योजना केल्या नाहीत तर हा वायू प्रदूषणाचा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे यावेळी योगेश शेटे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक नागरिकांना कर्करोग, श्वसनाचे आजार, फुफ्फुसाचे आजार, त्वचेवर, डोळ्यांवर, डोके, पोटावर परिणाम अशा भयानक प्रकारचे आजार उद्भवत असल्याचे योगेश शेटे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे वायू प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांवर तसेच बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी योगेश शेटे यांच्याकडून यावेळी मनपा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
जुईनगर सेक्टर २३ मधील सोसायटीतील रहिवाशांना मुबलक पाणी पुरवठा होत नाही आहे. तसेच जुईनगर गावठाण परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो आहे. जुईनगर सेक्टर २३ मधील जेष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र बनवून देण्यात यावे, जुईनगर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यांवर स्वच्छता करण्यात यावी, जुईनगर सेक्टर २३ मधील स्मशान भूमीमध्ये २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी मनसेचे जुईनगर विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, महिला उपशहर अध्यक्षा अनिथा नायडू, शहर सहसचिव अभिजित देसाई यांनी मनपाकडे यावेळी केली.



