संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राजकीय हेतूने अभिप्रेत असलेल्या विकासकामांना स्थगिती देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाने नवी मुंबई महापालिका प्रभागांमध्ये जवळपास अंदाजे 600 ते 650 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिल्याचे वर्तमानपत्रातील बातम्यांवरुन व विविध वृत्तवाहिन्यांवरुन समजले. मुळातच नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली आहे. तीन महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असतानाच महापालिका प्रशासनाने माजी नगरसेवकांच्या निर्देशानुसार विकासकामांना सुरुवात होणार असल्याचा बातम्यांमध्ये उल्लेख आहे. मुळातच महापालिका प्रशासनात गेली काही वर्षे प्रशासक असून जनतेला हवी असलेली विकासकामे, नागरी समस्यांचे निवारण, नागरी सुविधांची उपलब्धता प्रशासकांच्या माध्यमातून व्यवस्थित होत आहेत. ही सुरु होणारी विकासकामे म्हणजे माजी नगरसेवकांच्या अर्थकारणाला पाठबळ व जनसामान्यांमध्ये कामाचे श्रेय घेण्याची संधी असा दुहेरी हेतू माजी नगरसेवकांचा साध्य होणार आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीशी प्रतारणा असून निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रकार आहे. येऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी राजकीय स्वार्थांने अभिप्रेत असलेली ही विकासकामे प्रशासनाने तात्काळ रद्द करुन निवडणूका झाल्यावर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकासकामे करण्याची मागणी जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी केली आहे.



