कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आता न्यायालयीन लढा
स्वयम न्यूज ब्युरो :: Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून वेतन, सुविधा, समस्या निवारणात होणारा विलंब, वारंवार पाठपुरावा करुनही प्रशासनाकडून होत असलेली चालढकल या पार्श्वभूमीवर महापालिका परिवहन उपक्रमात ठोक मानधनावर काम करणाऱ्या चालक व वाहकांनी या अन्यायविरोधात औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील चालक-वाहकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महापालिका प्रशासनातील परिवहन उपक्रमात गेल्या काही वर्षांपासून ठोक मानधनावर चालक-वाहक काम करत आहेत. महागाईच्या काळात या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा तसेच मेडिक्लेम सुविधा पालिका प्रशासनकडून दिली जात नाही. याशिवाय त्यांच्या अन्य समस्या व असुविधांबाबत प्रशासन निर्णय घेत नाही. चालढकल केली जात आहे. केवळ आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. परिवहन विभाग चालक-वाहकांच्या जागा रिक्त असताना आजही ठोक मानधनावरच भरती करण्यात येत आहे. मेडिक्लेम योजना नसल्याने अपघात, अन्य गंभीर आजार, घरात अवलंबून असणाऱ्या लोकांचे आजार यावर उपचारासाठी या कर्मचाऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे. समान कामाला समान वेतन ही घोषणा म्हणजे दिशाभूल असून ठोक मानधनावरील चालक-वाहक आनी अण्य कायम सेवेतील चालक-वाहक यांच्या वेतनात खूपच मोठी तफावत आहे. वेतनवाढ, मेडिक्लेम सुविधा व अन्य मागण्यांसाठी तसेच समस्या निवारणासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांनी आजवर व्यापक प्रमाणात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. आयुक्त, परिवहन व्यवस्थापकांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. लेखी निवेदने, आंदोलने, निदर्शनेही केली आहेत. या कर्मचाऱ्यांना आजवर केवळ आश्वासने मिळाली आहेत. कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तुटपुंजे वेतन, मेडिक्लेम सुविधा व अन्य समस्यांच्या निवारणासाठी परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी युनियनच्या माध्यमातून कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली अखेरिस औद्योगिक न्यायालयात धाव घेत महापालिका प्रशासनाच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. परिवहन विभागातील ठोक मानधनावरील चालक-वाहक यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता माघार घेणार नसल्याचा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी दिला आहे.

