जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पुणेकरांना आणखी काही दिवस नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. सोमवारपासून शहरात पुन्हा पाणीकपात सुरू होणार का, याबाबत नागरिकांमध्ये पसरलेला संभ्रम आता दूर झाला आहे. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत घेतला जाईल, तोपर्यंत शहरात दररोज नियमित पाणी दिले जाईल, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने ७ ते १२ जुलैदरम्यान शहरात होणारी पाणीकपात स्थगित केली होती. ही मुदत संपत आल्याने सोमवारपासून पाणी कपात होणार का, अशी भीती पुणेकरांना होती. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील साठ्यात मोठी वाढ झाली असून, सध्या खडकवासला धरण साखळीत एकूण १६.६४ ते १६.७७ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. पुढील आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन या पाणीसाठ्याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच कपातीबाबतचा निर्णय होईल.
सध्या धरण साखळीत एकूण ५७.५२ टक्के म्हणजेच १६.७७ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण क्षेत्रात २०.७९ टीएमसी (७१.३१ टक्के) पाणीसाठा होता. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठा काहीसा कमी आहे.
गेल्या आठवडाभर पुणे शहर, घाटमाथा आणि कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अचानक विश्रांती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी ५०० ते ६०० मिलिमीटर बरसणाऱ्या पावसाची नोंद गेल्या २४ तासांत थेट शून्यावर आली आहे. विविध हवामान प्रणाली कमकुवत झाल्याने पावसाचा जोर कमी झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील पाच ते सहा दिवस पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात केवळ शिरगाव येथे १० मिमी, भीरा १२ मिमी, दवडी १० मिमी, पोफळी १२ मिमी आणि ताम्हिणी येथे १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, आधी झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमध्ये झालेली पाण्याची आवक पुणेकरांसाठी तूर्त दिलासा देणारी ठरली आहे.
धरणनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये):
खडकवासला: १.९४ टीएमसी
पानशेत: ६.३५ टीएमसी
वरसगाव: ७.०३ टीएमसी
टेमघर: १.४४ टीएमसी

