
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी केवळ जम्बो कोव्हीड सेंटरची निर्मिती करुन काहीही साध्य होणार नाही. या सेंटरमध्ये तज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती अत्यावश्यक आहे, अशी सूचना ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, ऐरोलीचे आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी कोरोनाबाबत चर्चा करताना नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे. आमदार गणेश नाईक यांनी कोरोना प्रतिबंधासंबंधी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासोबत सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) नियमित आढावा बैठक घेतली.
या आढावा बैठकीत आ. गणेश नाईकांनी कोरोना नियंत्रणासाठी आणखी काही महत्त्वाच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या. नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी न होता वाढतच आहे. देशातील अन्य काही राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आहे. या राज्यांमध्ये काम करीत असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती राज्याच्या आरोग्य सचिवांमार्फत घेऊन तशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती नवी मुंबईतील विविध कोरोना सेंटरमध्ये करावी, असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला सदर बैठकीत दिला.
कोरोना झाल्यावर कोरोना सेंटरमध्ये दाखल झालेल्या आपल्या रुग्णावर आपुलकीचे योग्य ते उपचार मिळतील, लवकर तो बरा होऊन घरी परतेल अशी आशा त्याच्या नातेवाईकांना असते. परंतु, अनेक वेळा कोरोना सेंटरमधून रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत. रुग्णांच्या प्राथमिक तक्रारींकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर रुग्ण ‘ऑक्सिजन’वर आणि त्यानंतर ‘व्हेंटिलेटर’वर जातात. कोरोना रुग्णांना सातत्याने नजरेखाली ठेवण्याची गरज आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकरिता स्वतंत्र मॉनिटरींग व्यवस्था करण्याची मागणी आ. गणेश नाईक यांनी यावेळी केली, ती पालिका आयुक्त बांगर यांनी मान्य केली.
कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारीचे पालन न करणे, मास्क न वापरणे, सॅनिटायझरचा वापर न करणे अशा कारणांमुळे ‘कोरोना’चा फैलाव झपाट्याने होतो आहे. त्याचा संसर्ग वाढू नये याकरिता जनहितासाठी जे लोक मास्क लावत नाहीत, त्यांच्याकडून दंड वसुली करण्यास हरकत नाही, असे मतही आमदार गणेश नाईक यांनी बैठकीत मांडले.
तर रुग्णांच्या सुरुवातीच्या त्रासाकडे लक्ष दिले नाही तर संबंधित रुग्ण मृत्युच्या दाराशी कधी पोहोचतो ते देखील कळत नाही. त्यामुळे कोरोना सेंटरमध्ये रुग्णांच नियमित मॉनिटरींग करण्याची बाब ऐरोलीचे प्रथम आमदार व नवी मुंबईचे विकासपर्व संदीप नाईक यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.
सदर आढावा बैठकीप्रसंगी आमदार गणेश नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सागर नाईक, सुधाकर सोनवणे, माजी नगरसेवक अनंत सुतार, डॉ. जयाजी नाथ, सुरज पाटील, दशरथ भगत, गणेश म्हात्रे, मुनावर पटेल, अमित मेढकर, दीपक पवार, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, सायली शिंदे, स्नेहा पालकर, विकास पालकर, नारायण शिंदे, जयंत हुदार, आदि उपस्थित होते.