भाजपा पदाधिकारी स्थानिक जनतेसह मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील रहिवाशी रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात तसेच अंर्तगत भागात फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत असून महापालिका सानपाडा विभाग कार्यालयाच्या अकार्यक्षमतेबद्दल स्थानिक नागरिक संताप व्यक्त करु लागले आहेत. फेरीवाल्यांना आर्थीक चिरमिरी स्वरुपात हप्ते मिळत असल्याने फेरीवाल्यांना ठोस कारवाई होत नसल्याचे सांगत आता याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचे फोटो व पालिका प्रशासनाकडून केवळ नावापुरतीच कारवाई होत असल्याची तक्रार वर्षा बंगल्यावर तसेच मंत्रालयात भेटून करणार असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी दिली.
सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कमालीचे वाढीस लागले आहे. या भागात मानखुर्द, गोवंडी या भागातून फेरीवाले व्यवसाय करत आहेत. या फेरीवाल्यांकडून त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या रहिवाशांना दमदाटी तसेच शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. रेल्वे स्टेशनपासून बाहेरच्या रस्त्यावर येईपर्यत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा अडथळा ओंलाडत तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविले जात नाही. त्यांच्यावर कारवाई करुन हा परिसर अतिक्रमणमुक्त केला जात नाही. या फेरीवाल्यांकडून स्थानिक पालिका अधिकाऱ्यांना दररोज आर्थिक मलिदा मिळत असल्यानेच या फेरीवाल्यांना , त्यांच्या अतिक्रमणाला व त्यातून निर्माण होणाऱ्या बकालपणाला पोसले जात आहे. या परिसरात असलेल्या गर्दीचा फायदा उचलत पाकिट मारणे, चैन स्नॅचिंग, तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने पळविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. इतकेच नाहीतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. फेरीवाले इतके निर्ढावले आहेत की, ते बिनधास्तपणे सांगतात की पालिकेत तक्रारी करा, कोणी आमचे वाकडे करणार नाही, आम्ही इथेच बसणार. या फेरीवाल्यांना तातडीने हटवून हा परिसर बकालपणातून मुक्त करण्यात यावा. एकही फेरीवाला बसणार नाही. याचे निर्देश द्या. जे या फेरीवाल्यांना वाचविण्यासाठी हफ्ते घेत असतील त्यांना समज द्या. पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गोवंडी-मानखुर्दच्या फेरीवाल्यांना अभय देण्याचे प्रकार आता थांबवा. सानपाडा सेक्टर सातमध्येही सिताराम मास्तर उद्यानाच्यासभोवताली असलेल्या पदपथावरदेखील फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. या उद्यानाबाहेरील पदपथावरुन स्थानिक रहीवाशांना चालता येत नाही. फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय पूर्णपणे पदपथावर विस्तारला आहे. या पदपथावर ये-जा करण्यासाठी जागा नसल्याने स्थानिक रहिवाशांना रस्त्यावरुन ये-जा करावी लागत आहे. त्यातून अपघातही घडले आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पडले आहेत. त्यांना दुखापतीही झाल्या आहेत. उद्यानाला बकालपणा आला आहे. उद्यानाला फेरीवाल्याच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी या ठिकाणीही सातत्याने फेरीवालाविरोधी अभियान राबवून उद्यानालगतचे पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी गुरुवारी महापालिका प्रशासनाकडे केली होती.
या तक्रारीवर कारवाई करण्यापूर्वी त्या ठिकाणी दररोज बसणारे फेरीवाले बसले नव्हते आणि पालिकेचे अतिक्रमण पथल माघारी फिरताच अवघ्या दोन ते तीन मिनिटात फेरीवाले व्यवसाय करु लागले. अतिक्रमण कारवाई कधी होणार, किती वेळेत होणार याची टीप महापालिकेच्या सानपाडा विभाग कार्यालयाकडून फेरीवाल्यांना मिळत असल्याने कारवाई केवळ तोंडदेखली नावापुरती होत असल्याचा आरोप सानपाडामधील जनतेकडून उघडपणे केला जात आहे. महापालिकेच्या सानपाडा विभाग कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांची नावे सानपाडामधील रहीवाशी उघडपणे घेत असून या तीनजणांना फेरीवाल्यांकडून आर्थिक मलिदा मिळत असल्याने फेरीवाल्यांना सानपाडा विभाग कार्यालय पोसत असून सानपाडा बकालपणाच्या खाईत ढकलण्यास सानपाडा विभाग कार्यालयच जबाबदार असल्याचा आरोप सानपाडामधील रहीवाशी उघडपणे करत आहेत.
फेरीवाल्यांना हटविण्यास व सानपाडामधील बकालपणा घालविण्यास महापालिकेचा सानपाडा विभाग कार्यालय ठोस कारवाई करत नसल्याने याप्रकरणी स्थानिक जनतेला घेवून वर्षा बंगल्यावर अथवा मंत्रालयात जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती पांडुरंग आमले यांनी यावेळी दिली.