प्रविण चौगुले
नवी मुंबई : ‘ए जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या उक्तीप्रमाणे ८४ लाख योनींमध्ये सर्वात प्रगत दुर्मिळ जन्म मानव जातीचा. आपण आलोय सर्व ईश्वराच्या इच्छेने, जाणेसुद्धा आहे त्याच्याच इच्छेनुसार. फक्त मानव जन्म मिळाला तर जगावे कसे, या दुनियेवर प्रेम अर्पूण मिळालेला हा खास मानव जन्म जनसेवेसाठी, जगाचे भले करण्यासाठी, त्यातही स्वतःवरही प्रेम करावे आणि मनसोक्त जगून घ्यावे, हे कोणाकडून शिकावे तर महेंद्रशेठ घरत यांजकडून. एक आदर्श राजकारणी, समाजकारणी, कामगार नेते, दानशूर व्यक्तिमत्त्व; परंतु अफलातून दुनियेची भटकंती करणारा अवलिया म्हणावे तर वावगे ठरू नये.
जगाचे सात खंड- आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सातवा अतिथंड वातावरण असलेला अंटार्टिका. सहा खंड मानव, पशू-पक्षी यांच्यासाठी राहाण्याजोगे आहेत. मात्र सातवा खंड अतिथंड, बर्फाचा गोळा, तरीही जीवसृष्टीचे दर्शन देणारा, त्यामुळे पेंग्विन, अस्वल याबद्दल प्रचंड कुतूहल, उत्सुकता आपल्याला आहे.
गेल्या २६ वर्षांत ६ खंड लीलया भटकंती तेही महाकठीण समजली जाणारी कैलास मानसरोवर परिक्रमा करून आता महेंद्रशेठ उभयता निघालेत अंटार्टिकाच्या प्रवासासाठी. स्वतः एकटे फिरले नाहीत जगभर, तर ४५० नातेवाईक, सहकारी, मित्र परिवाराला मोफत परदेश प्रवास त्यांनी घडविला. ताटातील अर्धी भाकरी भुकेलेल्याला, या कर्मवीरांच्या उक्तीप्रमाणे ते सतत समाजाच्या उन्नतीसाठी गेली ३८ वर्षे झिजत आहेत. हजारो युवकांना रोजगार, हजारो कामगारांचे नेतृत्व करून त्यांचे जीवन संपन्न करणारा नेता, तर किमान १५०० गोरगरीब सहकाऱ्यांना घरांसाठी मोफत अर्थसाह्य, अनेक शैक्षणिक संस्था, क्रीडा, कला क्षेत्राला भरघोस मदत करीत असताना स्वतःचे छंद मात्र अबाधित ठेवत जगणारा, स्वच्छंद मनाचा नेता, १४-१६ तास समाजासाठी झटणारा, अनेक विकासोपयोगी कामे करीत समाजातील तळागाळातील पददलितांचे जीवनमान उंचावत असताना रोज दिड ते दोन तास व्यायाम, ट्रेकिंग, क्रिकेटचा छंद अबाधित ठेवणारा, यासोबत भारताचा कानाकोपरा कन्याकुमारी, काश्मीर, लेह, लडाखची भटकंती करत जगातील तब्बल १०० देशांचा आणि ६ खंडांचा प्रवास पूर्ण करीत आता नुकतेच अंटार्टिकासाठी रवाना झालेत. विशेष म्हणजे अंटार्टिकाला रवाना होण्यापूर्वी त्यांनी परिसरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून अभिवादन केले. त्याच दिवशी मध्यरात्री त्यांचे विमान २.१० विमान होते, परंतु खोपटे येथे महापूजा, रात्री खोपटे व जासई येथे प्रकाशझोतालील क्रिकेट सामन्यांचे उदघाटन केले. म्हणजे अंटार्टिकाला निघण्यापूर्वीही त्यांनी आपली समाजाशी असलेली बांधिलकी जपली. त्यानंतरच घाईघाईत ते सुमारे २५ तासांच्या विमान प्रवासासाठी अंटार्टिकाला रवाना झाले. त्याबद्दल त्यांना एम. जी. ग्रुपतर्फे सुखकर प्रवासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

