संपादक : सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत प्रथम टप्प्यामध्ये घरांची गणना करणेबाबत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झालेल्या या ३ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात राज्य जनगणना संचालक तेजल कटारे आणि सांख्यिकी अधिकारी तुषार पाटील यांनी शास्त्रोक्त पध्दतीने घरांची गणना करण्याबाबतचे प्रशिक्षण उत्कृष्ट रितीने दिले.
प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी परिमंडळ २ उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी संजय शिंदे यांनी ज्याप्रमाणे निवडणुकीच्या कामात नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम केले त्याप्रमाणेच जनगणना कामात देखील महापालिकेचा पहिल्या तीनमध्ये नंबर येईल अशी ग्वाही सर्व अधिकारी – कर्मचारी यांच्या वतीने आयुक्तांना दिली.
जनगणनेचे काम हे राष्ट्रीय काम असून सर्वांनी ही जबाबदारी ओळखून आपापले काम चोखपणे पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. जनगणना हे काम देशासाठी अतिशय महत्त्वाचे असून विविध योजना राबवण्यासाठी शासनास आणि देशास आवश्यक असलेली सांख्यिकी माहिती याद्वारे प्राप्त होते. लोकसंख्या जनगणना २०२१ च्या कामामध्ये करोना लाटेमुळे उशीर लागला असून वेळीच जनगणना झाली असती तर महापालिका निवडणुकीकरिता लोकसंख्येचा योग्य आकडा प्राप्त होऊन महानगरपालिकेच्या क श्रेणीतही वाढ होऊ शकली असती असे त्यांनी सांगितले. जनगणना कामांमध्ये टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करीत त्यांनी प्रशिक्षकांचे आभार मानले.
सदर प्रशिक्षणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा चार्ज अधिकारी यांच्यासमवेत अतिरिक्त चार्ज अधिकारी नैनेश बदले, जनगणना कामासाठी नियुक्त अभियंते, लिपिक, तांत्रिक सहाय्यक इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर प्रश्न उत्तराच्या सत्रात उपस्थितांनी आपल्या मनातील शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले.

