जयेश खांडगे : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत सीसी दिलेल्या इमारतींपैकी बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन ओसी देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा असे निर्देश देण्यात येत आहेत, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य स्नेहा दुबे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, वसई-विरारमधील सुमारे दोन हजार तीनशे इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. एक हजार दोनशे इमारतींना यापूर्वीच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. वसई-विरार विकास कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ जुलै २०२५ रोजी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत बांधकामांना परवानगी देताना सर्व कायदेशीर बाबी काटेकोरपणे तपासून या क्षेत्रात भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत अभय योजना लागू करावी तसेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी धोरण निश्चित करावे असे निर्देश दिले होते. वसई – विरार क्षेत्रात मुंबईच्या धर्तीवर ‘अभय योजना’ लागू करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करत आहे प्रलंबित ओसीचा प्रश्न सुटल्यास रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा आणि इतर महापालिका सुविधा मिळणे सुलभ होईल. खासगी एजन्सीमार्फत सुरू असलेले इमारतींचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

