नवी मुंबई : कडक उन्हाळ्याने रहिवाशी त्रस्त झाले असल्याने उद्यानात बसविण्यात आलेल्या पाणपोईचे लोर्कापण तातडीने होण्याची गरज आहे. नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात फिरण्यासाठी तसेच व्यायामासाठी येणाऱ्या स्थानिक रहिवाशांकडून होत असलेल्या मागणीची दखल घेत स्थानिक विभागातील शिवसैनिक महादेव पवार यांनी उद्यानात बसविण्यात आलेल्या पाणपोईचे लवकरात लवकर लोकार्पण करण्याची मागणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
सेक्टर ६ येथील राजामाता जिजाऊ गार्डन परिसरात सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाणपोई उभारण्यात आली असली तरी ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. एप्रिल-मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे परिसरातील नागरिक, विशेषतः महिला व लहान मुले, पिण्याच्या पाण्याअभावी त्रस्त झाले आहेत.
पाणपोई बंद असल्यामुळे नागरिकांना घरून पाणी आणावे लागत असून, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात श्रीमती आशा कांबळे तसेच गार्डनमध्ये येणाऱ्या महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक शिवसैनिक महादेव पवार यांनी या प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, पाणपोई तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. “उन्हाळ्यात पाण्याची सर्वाधिक गरज असताना पाणपोई बंद ठेवणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे. पावसाळ्यात ती सुरू करून काहीही उपयोग होणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन पाणपोई सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्यात लोकांना गरज असताना पाणपोईचे उद्घाटन न करणे संतापजनक बाब असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक महादेव पवार यांनी केली आहे.

