संदीप खांडगेपाटील यांचे महापालिका आयुक्तांसह मुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे
नवी मुंबई : महापालिकेकडून होत असलेल्या पिवळसर रंगाच्या दूषित पाणी समस्येचे निवारण करण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून पिवळसर रंगातील दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी उकळले तरी पाण्याचा पिवळसरपणा जात नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिका प्रशासनाकडून व राजकीय घटकांकडून पाण्याच्या टेस्ट होत असल्याच्या बातम्या वाचतो, पण दूषित पाण्याचा पिवळसरपणा समस्येचे निवारण झालेले नाही. या पिवळसर पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. पाण्याच्या टेस्टच्या राजकारण्याच्या व प्रशासनाच्या बातम्या वाचून आता कंटाळा आला आहे. ही कार्यवाही प्रामाणिकपणे होत आहे का नुसती स्टंटबाजी आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्या दूषित पिवळसर पाण्यामुळे दगावल्यास त्या दुर्घटनेची जबाबदारी कोण स्विकारणार? या समस्या निवारणासाठी स्थानिक नेरूळ विभाग कार्यालयाकडे २९ मे २०२६ रोजी लेखी तक्रारही केली होती. तथापि आजही पिवळसर रंगातील दूषित पाण्याचाच पुरवठा होत आहे. घरातील शौचालयाच्या भांड्याचीही दिवसातून दोन ते तीन वेळा सफाई करावी लागत आहे. नाहीतर घरातील शौचालयाचे भांडे पिवळसर पाण्यामुळे सार्वजनिक शौचालयाचे भांडे भासते. समस्या गंभीर आहे. पाणी शुद्धीकरणाच्या व तपासणीच्या बातम्या आता खूप झाल्या, लोकांना पिवळसर दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण हवे आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पाण्याचे टॅकर मागविण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कमी दाबाच्या पाण्याच्या समस्येचेही निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

