महिलांच्या हाती एनएमएमटीचे स्टेअरिंग; महापौर सुजाताताई पाटील यांचा सक्षमीकरणाचा ‘मंगळागौर’ संकल्प
“एकजुटीतून आनंदासोबत परिवर्तनही शक्य”
मंगळागौरच्या माध्यमातून संस्कृतीचा जागर आणि नारीशक्तीचा सन्मान
नवी मुंबई : “एकटी व्यक्ती आनंदी होऊ शकते; मात्र एकजुटीने आनंदासोबतच परिवर्तनही घडविता येते. मंगळागौर स्पर्धा हे महिलांना एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहे,” असे प्रतिपादन नवी मुंबईच्या महापौर सौ. सुजाताताई पाटील यांनी केले. मंगळागौर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा असून, या माध्यमातून नारीशक्तीचा जागर होत असल्याचे सांगत मंगळागौर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला या महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या दूत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात महापौर सुजाताताई पाटील बोलत होत्या. मंगळागौरच्या पारंपरिक खेळ, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणातून महिलांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविले. त्याचवेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध योजना व उपक्रम राबविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगताना महापौर सुजाताताई पाटील यांनी महिलांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. नवी मुंबई महानगर परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) बसेसचे चालक म्हणून महिलांनाही संधी देण्यात येणार असून, त्यासाठी महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारी योजना महासभेत मंजूर करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
महिलांना रोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी पारंपरिक भूमिकांपुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रांत आत्मविश्वासाने पुढे यावे, यासाठी महानगरपालिका आवश्यक त्या संधी उपलब्ध करून देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील एकल महिलांसाठीच्या विविध योजनांसाठी नोंदणी सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंगळागौरमधून संस्कृती आणि एकजुटीचा संदेश
मंगळागौर स्पर्धेबाबत बोलताना महापौर सुजाताताई पाटील यांनी महिलांच्या सामूहिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. “एकत्र येणे हीच मोठी ताकद आहे. एकजुटीने केवळ आनंद साजरा होत नाही, तर परिवर्तनाची सुरुवातही होते,” या भावनेतून त्यांनी मंगळागौर स्पर्धेकडे पाहण्याचे आवाहन केले.
मंगळागौरच्या माध्यमातून जुन्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम महिला करीत आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिला समूहाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सर्व सहभागी महिलांचे अभिनंदन केले.
महिलांच्या योजनांना गती देण्याची अपेक्षा
यावेळी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे यांनी मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन होत असल्याचे सांगितले. सर्व महिला एकत्र आल्याने हा कार्यक्रम आनंदोत्सव ठरला असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांसाठी महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सभागृह नेते सागर नाईक यांनी नवी मुंबई हे परस्पर प्रेमभाव जपणारे कुटुंब असल्याचे सांगितले. येथील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील ‘लखपती दीदी’ योजना यशस्वीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगत, मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून परंपरेचा संस्कार जपला जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
महिला बचतगटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती सलुजा सुतार यांनी प्रास्ताविकातून समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून सुमारे २० प्रकारच्या योजना व उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी आणि महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्याचे ठोस प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने दिवाळीपूर्वी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या साहित्याच्या विक्रीसाठी विशेष महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कौशल्याचे रोजगारात रूपांतर करण्याचे आवाहन
याप्रसंगी जीवन आधार फाऊंडेशनच्या संस्थापक ॲड. रेखा चिरनेरकर यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानातून महिलांना आपल्या कौशल्यांची ओळख करून घेण्याचे आवाहन केले. महिलांनी आपल्यातील कौशल्यांचे रूपांतर रोजगाराच्या संधीमध्ये कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असून, आपल्या उत्पादनांच्या प्रचार आणि विक्रीसाठी समाजमाध्यमांचा जास्तीत जास्त प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘रूचिरा ग्रुप’ ऐरोली प्रथम
महिला मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात पार पडली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल ३२ महिला समूहांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरीतून १० समूहांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती.
अंतिम फेरीत रूचिरा ग्रुप, ऐरोली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नारीशक्ती मंगळागौर समूह, नेरूळ यांनी द्वितीय क्रमांक, तर वाशीचा राजा महिला बचत गट, वाशी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
आदिशक्ती ग्रुप, ऐरोली आणि नूतन एकता महिला मंडळ, बेलापूर या महिला समूहांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अंतिम फेरीत स्थान मिळविलेल्या राधेश्याम महिला मंडळ, तुर्भे; धनलक्ष्मी महिला मंडळ, कोपरखैरणे; संस्कृतीची शान समूह, घणसोली; नव्या फाऊंडेशन, घणसोली आणि नृत्य इल्यूजन डान्स स्टुडिओ, नेरूळ या पाच नृत्यसमूहांना त्यांच्या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. नामवंत नृत्यकलावंत श्री. अशिमिक कामठे आणि श्रीमती आरती पानसरे यांनी मंगळागौर स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्या नृत्यसादरीकरणालाही उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विविध वयोगटांतील महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषा, नृत्य, मंगळागौरीचे खेळ आणि सांस्कृतिक सादरीकरणातून महिलांनी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले.
६५ महिला बचतगटांचे स्टॉल्स
महिला मेळाव्याच्या निमित्ताने ६५ महिला बचत गट आणि महिला मंडळांनी उत्पादित केलेल्या विविध साहित्याचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या माध्यमातून महिलांच्या हस्तकला, गृहउद्योग आणि विविध उत्पादनांना व्यासपीठ मिळाले.
सकाळी ९ वाजल्यापासून मंगळागौर स्पर्धेच्या अंतिम फेरीने महिला मेळाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण केले. महिला मेळाव्यासाठी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी महापौर सुजाता पाटील यांच्यासमवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदाताई म्हात्रे, सभागृह नेते सागर नाईक, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती सलुजा सुतार, फ प्रभाग समिती सभापती श्रीमती ललिता मढवी, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेविका अंजनी भोईर, स्वाती गुरखे, शशिकला पाटील, दयावती शेवाळे, ॲड. भारती पाटील, मिरा पाटील, संतोषी म्हात्रे, अंजना म्हात्रे, प्रिती भगत, शिल्पा ठाकूर, श्रेया जिरगे, मिनाक्षी पाटील, वैष्णवी नाईक, माधुरी सुतार, अंजली वाळुंज, प्रतिक्षा पाटील, रेश्मा मढवी, माजी नगरसेविका उषा भोईर, शिल्पा कांबळी, संगीता म्हात्रे, मोनिका पाटील, समाजविकास विभागाचे उपआयुक्त प्रकाश कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मंगळागौरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर करतानाच महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या संधी निर्माण करण्याचा संदेश या महिला मेळाव्यातून देण्यात आला. परंपरेचा वारसा जपत आधुनिक रोजगाराच्या संधींकडे महिलांनी वाटचाल करावी, या महापौर सुजाताताई पाटील यांच्या भूमिकेला या मेळाव्यात विशेष अधोरेखित करण्यात आले.