वाशीतील क्लाऊडनाईन रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न
२०२४ पासून अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचा दावा
नवी मुंबई : अमरावती येथील रुग्णालयातील भीषण आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नवी मुंबईतील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वाशी येथील क्लाऊडनाईन रुग्णालयाकडे २०२४ पासून अग्निशमन विभागाचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र नसल्याचा दावा असून, आरोग्य विभागाकडील रुग्णालय नोंदणीचेही नूतनीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतानाही रुग्णालय सुरू असल्याने नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालयात नवजात बालके आणि गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. अशा ठिकाणी अग्निसुरक्षेच्या नियमांमध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. अमरावतीसारखी दुर्घटना नवी मुंबईत घडण्याची मनपा वाट पाहत आहे का? आग लागल्यानंतर नवजात बालकांची प्रेतं बाहेर काढायची वाट मनपा बघतेय का?” असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तुषार कचरे यांनी उपस्थित केला.
अग्निशमन, नगररचना व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अग्निशमन विभाग, नगररचना विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संभाव्य संगनमतातून नियम डावलून परवानग्या दिल्या जात असल्याचा संशय आहे. नवी मुंबईत अशा प्रकारे नियम व परवानग्यांबाबत प्रश्न निर्माण झालेले शेकडो रुग्णालये आहेत. या संपूर्ण व्यवस्थेची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कचरे यांनी केली.
क्लाऊडनाईनसह नवी मुंबईतील सर्व रुग्णालयांची अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्रे, आरोग्य नोंदणी तसेच बांधकाम व वापराच्या मंजुरीची तातडीने तपासणी करून नियमबाह्य बाबींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दुर्घटना झाल्यानंतर चौकशी नको; त्याआधी कारवाई करा. जीवितहानी झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करून मृतांचे जीव परत येणार नाहीत, असे तुषार कचरे यांनी स्पष्ट केले.
कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा युवक जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी दिला.
“नागरिकांच्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अमरावतीसारखी दुर्घटना नवी मुंबईत घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा नितीन चव्हाण यांनी दिला.
आमचा विरोध रुग्णसेवेला नाही; रुग्णांच्या जीविताशी तडजोडीला आहे. अमरावतीसारखी घटना घडून नवजात बालकांची प्रेतं बाहेर काढण्याची वेळ नवी मुंबईवर येऊ नये,” असे तुषार कचरे यांनी ठामपणे सांगितले.



