निविदेआधीच पथदिव्यांचे काम? समीर बागवान यांच्याकडून चौकशीची मागणी
नेरुळमधील २१ लाखांच्या कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाईची मागणी
श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ येथील ज्वेल परिसरात फॉर्म्युला ४ नाईट रेसिंग स्पर्धेसाठी रस्ता दुभाजकावरील पथदिवे स्थलांतरित करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या २१ लाख ६ हजार २३ रुपयांच्या कामाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवी मुंबई उपशहरप्रमुख व महापालिका परिवहन समितीचे माजी सदस्य समीर बागवान यांनी केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच प्रत्यक्ष काम करण्यात आल्याचा संशय असल्याने या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या कामाच्या अंदाजपत्रकात ९० नग आरसीसी पायाभरणी, सुमारे २३९५ मीटर विद्युत केबल, २०१५ मीटर वाहिनी तसेच ९० पथदिवे खांबांसाठी विद्युत यंत्रणा आणि विविध प्रकारचे पथदिवे खांब व दिवे यांचा समावेश असल्याचे बागवान यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
त्यामुळे अंदाजपत्रकात नमूद केलेले प्रमाण आणि प्रत्यक्षात झालेले काम यांची मोजमापासह तांत्रिक पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष किती काम आवश्यक होते आणि किती काम करण्यात आले, याचीही स्वतंत्र तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे बागवान यांनी म्हटले आहे.
यापूर्वी झालेले काम, सध्या प्रस्तावित असलेले काम आणि प्रत्यक्ष आवश्यक असलेले काम यामध्ये दुबार काम अथवा दुबार खर्च झाला आहे का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी प्रत्यक्ष कामाची मोजमाप नोंद, कामाचे आदेश, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी तसेच संबंधित देयकांची तपासणी करण्याची मागणी बागवान यांनी केली आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच काम झाल्याचे किंवा आर्थिक अथवा प्रशासकीय अनियमितता झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास, संबंधित अधिकारी, कर्मचारी व दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच सार्वजनिक निधीचे नुकसान झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून नुकसानाची रक्कम वसूल करावी, अशी स्पष्ट भूमिका समीर बागवान यांनी मांडली आहे.
कोट
सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामात नियम, पारदर्शकता आणि तांत्रिक अचूकता अत्यावश्यक आहे. या प्रकरणातील प्रत्येक बाब तपासून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे .२१ लाखांच्या या कामातील अंदाजपत्रक, प्रत्यक्ष काम आणि प्रशासकीय प्रक्रिया यांची पारदर्शक तपासणी होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी चौकशी करावी.
-
समीर बागवान, शिवसेना उबाठा गट नवी मुंबई उपशहरप्रमुख