ओबीसी जनगणनेवरून नाना पटोलेंचा सरकारला इशारा
जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
खुल्या प्रवर्गात ढकलण्याचा मोदी सरकारचा डाव
नाना पटोलेंचा राज्यपालांकडे धाव, जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी
मुंबई : ओबीसी समाजाची जातनिहाय आकडेवारी लपविण्याचा प्रयत्न करून त्यांना खुल्या प्रवर्गात ढकलण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा डाव असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला. जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना ठेवून प्रत्येक जात व उपजातीची अचूक नोंद करावी, अशी मागणी त्यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली.
पटोले यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले. ओबीसींची अधिकृत जातनिहाय संख्या स्पष्ट झाल्याशिवाय आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि कल्याणकारी योजनांचे न्याय्य नियोजन होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनगणनेच्या अर्जातील प्रश्नांच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बिहार आणि तेलंगणाच्या धर्तीवर देशभर जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी पटोले यांनी केली. खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवूनही उत्तर मिळाले नसल्याचा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा!
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी संकटात सापडल्याचे सांगत पटोले यांनी फडणवीस सरकारला दुष्काळ जाहीर करण्याचे आव्हान दिले. शेतकरी आणि शेतमजुरांना भरीव आर्थिक मदत देण्यासोबतच जनावरांसाठी चारा व पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“ओबीसींच्या हक्काचा प्रश्न असो किंवा दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारने आता कागदावरील आश्वासनांपलीकडे जाऊन निर्णय घ्यावा,” असा थेट इशारा पटोले यांनी दिला.