जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिकेची वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४ व ५ वरील धोकादायक इमारत पाडण्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाला तातडीने निर्देश देण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
वाशी सेक्टर १४ मधील प्लॉट ४ व ५ वर महापालिका प्रशासनानेच इमारतीचे बांधकाम केले असून ही इमारत महापालिका प्रशासनाच्या मालकीची आहे. ही इमारत सध्या जिर्ण अवस्थेत असून आयआयटीने ही इमारत धोकादायक घोषित केलेली आहे. या इमारतीच्या निर्मितीपासून सर्व काही संशयास्पद प्रकार असल्याने याची प्रशासकीय पातळीवर चौकशी होणे आवश्यक आहे. ही इमारत कशासाठी बांधण्यात आली? या इमारतीवर आतापर्यत पालिका प्रशासनाचा किती निधी खर्च झाला आहे? ही इमारत बांधण्यासाठी महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी शिफारस केली आहे? या इमारतीच्या सदोष बांधकामाला व अल्पावधीतच इमारत जीर्ण होऊन धोकादायक स्थितीत जाण्याला कोण जबाबदार आहे? यामध्ये पालिकेचे कोणकोणते अधिकारी दोषी आहेत? इमारत धोकादायक अवस्थेत असतानाही ती इमारत पाडण्यास टाळाटाळ का केली जात आहे? इमारत बांधकामप्रकरणास व धोकादायक होण्यास तसेच धोकादायक असूनही पाडण्यास विलंब करण्यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईस का चालढकल केली जात आहे, या सर्वांची प्रशासकीय पातळीवर चौकशी होऊन नवी मुंबईकरांना सर्व माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. इमारतीची सध्याची अवस्था पाहता मुसळधार पावसात ती कधीही पडण्याची भीती आहे. त्यामुळे जिवितहानी व्यापक प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. इमारत पडल्यास व त्यात जिवितहानी झाल्यास त्यास कोण जबाबदार असणार आहे? याचेही महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईकरांना लेखी स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. आपण संबंधितांना ही महापालिकेच्या मालकीची धोकादायक इमारत पाडण्याचे संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.
संदीप खांडगेपाटील यांच्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ नगरविकासचे सेक्रेटरी डॉ. गोविंद राज यांच्याकडे तर महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी संबंधित उपायुक्तांकडे तर उपायुक्तांनी वाशी विभाग कार्यालयाचे विभाग अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविले आहे.



