
जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : शिवजन्मभूमी म्हणून जगभरात नावलौकीक असलेल्या जुन्नर तालुक्यातील रहीवाशी सध्या बिबट्यांच्या व चोरांच्या उपद्रवाने त्रस्त झाले आहेत. बिबट्याचे वाढते प्रमाण तसेच घरफोडीच्या दिवसा उजेडीही वाढत चाललेले गुन्हे यामुळे प्रशासनाने जुन्नर तालुक्यातील रहीवाशांची बिबट्याच्या व चोरांच्या उपद्रवातून मुक्तता करण्याची मागणी जुन्नरवासियांकडून करण्यात येत आहे.
बिबट्याच्या समस्येतून जुन्नर तालूकावासियांची मुक्तता करण्यास गेल्या काही वर्षापासून राज्य सरकारला अपयश आलेले आहे. तालुक्यामधील गावागावातील लहान मुलांवर हल्ले तसेच पाळीव जनावरांवर हल्ले या घटना घडत असताना बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास राज्य सरकारच्या प्रयत्नांना मर्यादा पडल्या आहेत. जुन्नर तालुक्यात दिवसाउजेडीही बिबट्याचे दर्शन होत आहे. गावागावांमध्ये मोकाट कुत्री, मांजरीदेखील बिबट्यांने संपविल्या असून शेळ्या-मेंढ्या, गायांची लहान वासरे यावर बिबट्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. मेंढपाळाच्या कळपावर हल्ला करुन त्यातील मेंढ्या बिबट्या उचलून नेत आहेत. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी शेतात एकटे कोणी काम करण्याचे सहसा धाडस दाखवित नाहीत. सभोवतालचा डोंगराळ प्रदेश, जंगल, ऊसाचे वाढते क्षेत्र, पिंपळगावा जोगा परिसरात पाण्याची मुबलक उपलब्धता यामुळे बिबट्यांच्या अस्तित्वाचा आलेख उंचावत चालला आहे. राज्य सरकारकडे वारंवार तक्रारी करुनही बिबट्याच्या उपद्रवातून मुक्त होत नसल्याने जुन्नर तालुक्यातील रहिवाशी उघडपणे नाराजीचा सूर आळवित आपला संताप व्यक्त करत आहेत.
जुन्नर तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून घरफोड्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी घरफोड्या होत असायच्या, पण गेल्या महिनाभरापासून तालुक्यात दिवसाउजेडीसह घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. तालुक्याचा विस्तिर्ण परिसर व उपलब्ध असलेले तुटपुंजे पोलिसी बळ यामुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा शोध घेताना पोलिस तपासावर मर्यादा पडत आहेत. शेतात कामावर गेलेल्या लोकांची बंद घरे दिवसा फोडून त्यातील सोने, चांदी, रोख रक्कम, घरातील मौल्यवान वस्तू घरफोडीत चोरीला जावू लागल्या आहेत. सुरुवातीला अंदाज घ्यायचा, सीसीटीव्ही फोडायचे, काही सेंकदात टाळे तोडून मिळेल ते घेवून घरफोडी करणारे पलायन करत असतात. तालुक्यातील अनेक घरफोड्यांमध्ये एका दुचाकीवरुन तीन जणांची टोळी येत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर घरफोडी करणाऱ्या टोळीस अटक करण्याची मागणी तालुक्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.



