जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर सेक्टर ३,४,५, ७ व इतर परिसराकडे जाण्यासाठी स्टेशनबाहेरील रस्त्यावर असणाऱ्या फेरीवाल्यांचा अडथळा पार करावा लागतो. सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील परिसराला दुपारनंतर रात्री उशिरापर्यत फेरीवाल्यांचा विळखा पडलेला असतो. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी व परिसर अनधिकृत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी भाजयुमोचे माजी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडूरंग आमले गेल्या वर्षभरापासून तुर्भे विभाग कार्यालयापासून ते महापालिका मुख्यालयापर्यंत सातत्याने लेखी पाठपुरावा करत आहेत. उपायुक्तांच्या भेटीगाठी घेत आहेत. पांडूरंग आमले हे बेलापूरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निकटवर्तीय कडवट समर्थंक असतानाही महापालिका प्रशासन त्यांच्या फेरीवाला हटविण्याच्या पाठपुराव्याला केराची टोपली दाखवत असल्याचा संताप सानपाडामधील रहीवाशी तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेला असतानाही नवी मुंबई महापालिका प्रशासन या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा करत त्यांना सहकार्य करण्याचीच भूमिका घेत असल्याचा आरोप सानपाडामधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. सानपाडा नोडमधील भाजपाचे स्थानिक नेते व आमदार मंदाताई म्हात्रे यांचे जवळचे सहकारी म्हनून नवी मुंबईत ओळखल्या जाणाऱ्या पांडूरंग आमले यांनी फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटिवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला आहे व अधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेतल्या आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई फेरीवाल्यांविरोधात केली जात नाही. फेरीवाल्यांकडून स्थानिक तुर्भे विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागातील घटकांना आर्थिक ‘चिरीमिरी’ मिळत असल्याने फेरीवाल्यांच्या अतिक्रमण समस्येवर तोडगा निघत नसल्याचा आरोप सानपाडामधील रहिवाशांकडून उघडपणे करण्यात येत आहे.
सानपाडा रेल्वे स्टेशनबाहेरील रस्त्यावर बसणारे फेरीवाले हे गोवंडी-मानखुर्द परिसरातील असून पालिका कारवाई करत नसल्याने या फेरीवाल्यांचे धाडस वाढीस लागले आहे. काही महिन्यापूर्वी फेरीवाले त्यांच्या भागातील मुले घेवून पांडूरंग आमले यांना शोधत असल्याचे सानपाडावासियांना जवळून पाहिले आहे. फेरीवाल्यांमुळे जीवाला धोका निर्माण झाला असल्याची कल्पना पांडूरंग आमले यांनी स्थानिक सानपाडा पोलिसांनाही दिलेली आहे. भाजपाच्या आमदार असतानाही महापालिका फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्याचेही आश्चर्य स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केले जात आहे. कितीही पाठपुरावा केला तरी आमच्यावर पालिका कारवाई करणार नसल्याचे फेरीवाल्यांकडून उघडपणेस सांगितले जात असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



