स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘पनवेलचा महागणपती’ चरणी भक्तिभावाचा महापूर उसळला. कळंबोली येथील श्री राम मानस मंडळातर्फे भक्तिपूर्ण सुंदरकांड सेवेमुळे वातावरण दुमदुमले. पवित्र श्रीराम चरितमानसाचे पठण, गजर, स्तोत्रांचा निनाद, टाळ-झांजांच्या तालावर भक्तांच्या तोंडून उमटणारे ‘जय श्रीराम’चे घोष यामुळे महागणपतीच्या मंडपात दैवी वातावरणाचे दर्शन घडले.
श्री राम मानस मंडळाचे श्याम सुंदर शुक्ला, सुशील पांडेय, सी. पी. मिश्रा, शुभम पांडेय, मुकेश चतुर्वेदी, शुभम शुक्ला आणि राम नरेश यांच्या पथकाने आपल्या ओजस्वी वाणीने, भावपूर्ण गायनाने व सामूहिक स्वरांनी सुंदरकांडाचा अखंड निनाद घडवला. यावेळी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
सुंदरकांडातील हनुमानजींच्या पराक्रमाच्या कथा, रामभक्तीची ओजस्वी गाथा आणि संकटमोचन संदेश यामुळे श्रोत्यांच्या हृदयात भक्तिभाव ओसंडून वाहत होता.
पनवेलचा महागणपती हा फक्त ऐश्वर्य, परंपरा आणि उत्साहाचा नाही तर भक्ती व प्रबोधनाचाही केंद्रबिंदू आहे. यंदाच्या उत्सवाचे पहिले पुष्प सुंदरकांड सेवा अर्पण करून झाल्याने पनवेलचा गणेशोत्सव एक आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला. गणपती बाप्पा आणि प्रभू श्रीराम यांच्या स्तवनाने उत्सवाला सुरुवात होणे म्हणजे दैवी संगमाचा जणू अनुभवच हाेता.
रामचरितमानस हा संत तुलसीदासांनी रचलेला अमूल्य ग्रंथ आहे. त्यातील सुंदरकांड हा विशेष अध्याय मानला जातो. हनुमानजींचे पराक्रम, भक्तीची अढळ ताकद, संकटावर मात करण्याची प्रेरणा आणि श्रद्धेचा अनोखा संदेश यामुळे सुंदरकांडाचे सामूहिक पठण नेहमीच मन:शांती व सकारात्मक ऊर्जा देणारे ठरते.
कळंबोली येथील श्री राम मानस मंडळ गेली अनेक वर्षे रामभक्तीचा जागर करणारे उपक्रम राबवत आहे. सुंदरकांडाचे आयोजन हे त्यांच्या प्रमुख सेवांपैकी एक असून दरवर्षी पनवेलचा महागणपतीच्या चरणी ते अापली सेवा अर्पण करत अाहेत.
सुंदरकांड पठण सुरू होताच मंडपात शांतता आणि एकाग्रतेचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक चौपाईसोबत श्रोत्यांच्या ओठांवरून ‘जय हनुमान, जय श्रीराम’चे गजर उमटत होते.
भाविक महिलांनी टाळ्या वाजवत सेवा अधिक सुरेख केली. तर लहान मुलांनीही या भक्तिमय कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला.समाजजागृतीचा महायज्ञ
——————————
गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून श्रद्धा, संस्कृती, भक्ती आणि समाजजागृतीचा महायज्ञ आहे. श्री राम मानस मंडळ, कळंबोली यांच्या सुंदरकांड सेवेमुळे पनवेलच्या महागणपतीच्या मंडपात त्याचीच अनुभूती आली. भक्तिभाव, संगीत, सामूहिक स्तवन आणि सामाजिक संदेश यांचा संगम झाल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.
सुंदरकांड सेवेमुळे पनवेलकरांना लाभली आध्यात्मिक पर्वणी
——————————
सुंदरकांड सेवेमुळे पनवेलकरांना आध्यात्मिक पर्वणी लाभली. उत्सवाच्या पहिल्या दिवशीच हा कार्यक्रम झाल्याने पुढील नऊ दिवसांचा उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभाव अधिक वाढीस लागेल, असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला.
अनेकांनी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोशल मीडियावर केले, ज्यामुळे दूरवर असलेले रामभक्तही या भक्तीमय सेवेत सहभागी होऊ शकले.
सेवेच्या अखेरीस महाआरतीचा भव्य सोहळा संपन्न झाला. शंखनाद, टाळच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’च्या घोषात वातावरण भारावून गेले.
पनवेलच्या महागणपतीसमोर गाऊन सेवा करण्याचा आनंद वेगळाच: सुशील पांडे
——————————
पनवेलच्या महागणपती चरणी दरवर्षी सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्या जीवनातील परम भाग्य आहे. प्रत्येक वर्षी या ठिकाणी सुंदरकांड सेवा अर्पण करतो.
पनवेलच्या महागणपतीसमोर गाऊन सेवा करण्याचा आनंद आणि अनुभव काही वेगळाच आहे, अशी भावना श्रीराम मानस मंडळाचे प्रमुख सुशील पांडे यांनी व्यक्त केली.
संकटसमयी श्रद्धा, सामूहिक एकात्मता अन् भक्तीची ताकद ‘सुंदरकांड’ देते: कडू
——————————
गणेशोत्सव म्हणजे केवळ आरास, रोषणाई किंवा ढोल-ताशा एवढाच नाही. तर तो अध्यात्म, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा उत्सव आहे.
सुंदरकांड सेवेद्वारे संत तुलसीदासांचा अमर संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचतो. संकटसमयी श्रद्धा, सामूहिक एकात्मता आणि भक्तीची ताकद किती मोठी आहे, हे यामुळे जाणवतेच.
त्यामुळेच दरवर्षी सादर हाेणारे सुंदरकांड यंदा पहिल्याच दिवशी अायाेजित केले हाेते, असे कांतीलाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सांगितले.



