नवी मुंबई : सानपाडा परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारासमोरील कचऱ्याचे ढिगारे, रस्त्यावरील खड्डे याबाबत भाजपचे नवी मुंबई जिल्हा सचिव पांडुरंग आमले यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची महापालिका प्रशासनाने दखल घेतली असून रस्त्याची डागडूजी कामास सुरुवात करण्यात आली आहे. कचऱ्यांचे ढिगारे पालिका प्रशासनाकडून हटविण्यात आले आहेत.
सानपाडा परिसरात सेक्टर सातमध्ये सेव्हन्थं डेज हायस्कूल व न्यू अवधूत सोसायटीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहने घेवून जाताना तारेवरची कसरत करावी लागत असे. वाहनातील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय त्या रस्त्यालगत असलेल्या पदपथावरुन ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावरही वाहनामुळे पाणी उडून त्यांचे कपडे खराब होत आहेत. या खड्ड्यांमुळे स्थानिक रहिवाशी व वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना तातडीने या परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे. पांडुरंग आमले यांनी पालिका प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती. अखेरिला खड्डे न बुजल्यास तिथे वृक्षारोपण करण्याचा इशारा पांडुरंग आमले यांनी दिल्यावर प्रशासनाला जाग आली व रस्त्यावरील खड्डे बुजवत डांबरीकरणाच्या कामास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे.
सानपाडा सेक्टर तीनमधील गृहनिर्माण सोसायटींच्या प्रवेशद्वारासमोरील कचऱ्यांचे ढिगारे हटविण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा भाजपचे सचिव पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली होती. सानपाडा सेक्टर तीनमधील स्नेहबंधन व गुरुकृप्पा सोसायटीजवळील प्रवेशद्वारावर बाराही महिने कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळतात. महापालिका प्रशासन स्वच्छतेसाठी आग्रही भूमिका असताना अशा प्रकारच्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यामुळे सानपाडा परिसराला बकालपणा प्राप्त होत असतो. स्थानिक लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. अशा प्रकारचे कचऱ्याचे ढिगारे निर्माण होवू नये यासाठी पालिका प्रशासनाने या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये प्रबोधनात्मक जनजागृती करावी. त्यांना कचरा संकलनासाठी डब्बे द्यावेत व त्यानंतरही त्या ठिकाणी कचरा आढळून येत असल्यास कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधित ठिकाणी असलेले कचऱ्यांचे ढिगारे तात्काळ हटविण्यासाठी निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. प्रशासनाने आमले यांच्या निवेदनाची दखल घेत कचऱ्याचे ढिगारे हटवूण परिसराची स्वच्छता केली आहे. रस्त्यावरील खड्डे व कचऱ्याचे ढिगारे समस्यांचे निवारण झाल्याबद्दल सानपाडामधील रहिवाशांनी पांडुरंग आमले यांचे आभार मानले आहेत.



