स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : कायद्याबद्दल अज्ञान असणे हाच मुळात मोठा गुन्हा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अस्थितज्ज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांनी केले. तेव्हा सभागृहातील उपस्थितांनी कान टवकारले होते…. जेष्ठ पत्रकार कांतीलाल कडू संपादित दैनिक निर्भीड लेखच्या २९ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन डॉ. म्हात्रे यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कोर्टाच्या कामनिमित्त जावे लागल्याने न्यायालयाचा परिचय झाला आणि एक दिवशी न्यायाधीशांनी मला कायद्याविषयी विचारले, संवाद झाला. परंतु, न्यायाधीशांनी त्यावेळी सांगितले की, कायद्याविषयी अज्ञान असणे हाच मुळात मोठा गुन्हा आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
गेल्या तीस वर्षापासून माझी आणि कांतीलाल कडू यांची मैत्री आहे. त्या मैत्रीनेच मला इथे खेचून आणले, असा मैत्रीचा भावनिक पदरही डॉ. म्हात्रे यांनी हळूवारपणे उलगडून दाखविला.
कायद्याविषयक दिवाळी अंक काढून कांतीलाल कडू यांनी मैलाचा दगड पार केला आहे. आजकाल सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठांची मोठी फसवणूक होत असल्याच्या गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यावरही कांतीलाल कडू यांनी विशेष अंक प्रकाशित करावे, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी कडू यांना डॉ. नितीन म्हात्रे यांनी प्रेमाने आलिंगन दिले. कार्यक्रमास एम. जी. एम. हॉस्पिटल आणि कॉलेज रिसर्च सेंटरच्या अधिष्ठात्या निर्मला कासेकर, शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, ब्लॅक पँथरचे नेते जगदीश गायकवाड, ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. भक्तीकुमार दवे, उद्योजक विजय लोखंडे, सरकारी वकील आणि कविवर्य एड. वाय. एस. भोपी, ज्येष्ठ संपादक सुनील पोतदार, रमेश भोळे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर त्यांच्या समवेत एड. प्रफुल्ल म्हात्रे आणि हॉटेल व्यावसायिक सुरेशशेठ फडके उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांतीलाल कडू यांनी केले. त्यांनी व्यासपीठावरील उपस्थितीचा अचूक अंदाज घेत विनोदी शैलीतून शब्दांचे मोठ्या आवाजाचे फटाके फोडले. त्यांच्या भाषणावर दिवाळीच्या फटाक्यापेक्षा जास्त आवाजाच्या टाळ्या पडल्या. पोलिस उपस्थित नसल्याने उपस्थितांच्या खळखळून हसण्याचा आणि टाळ्यांचा डेसिबल मोजता आला नाही.
तितक्याच उत्कट कार्यक्रमाचे खुसखुशीत सूत्रसंचालन अभय पै यांनी करून रंगत आणली. उपस्थितांचे आभार सरकारी डॉक्टर आणि कविवर्य राजेंद्र राठोड यांनी मानले.



