सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या पवित्र कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीची तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे. त्यासाठी तपोवनात काही वृक्षतोड होणार असल्याचा कांगावा करून काही ‘राजकीय’ पर्यावरणप्रेमींनी आंदोलन सुरू केले आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले. “पर्यावरणप्रेमाच्या नावाखाली कुंभमेळा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. बकरी ईदच्या वेळी हे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी गप्प का असतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंत्रालयात माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “कुंभमेळा हा हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे. हे तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी अन्य धर्मांच्या उत्सवांवर कधीही असे प्रश्न उपस्थित करत नाहीत. देशात खरोखरच सर्वधर्मसमभाव असेल, तर केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांवर हरकती का घेतल्या जातात? ईदच्या वेळी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची कत्तल होते, रक्ताचे पाणी रस्त्यांवर वाहते, पर्यावरण आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो; पण त्याविरोधात हे ‘प्रेमी’ कधी बोलताना दिसत नाहीत. ‘व्हर्च्युअल बकरी ईद’ साजरी करा, असे कोणी म्हणताना कानावर पडत नाही. मग एका धर्माला एक न्याय आणि दुसऱ्या धर्माला दुसरा न्याय का?”
हिंदू धर्मालाच टार्गेट का करता?
मंत्री राणे म्हणाले, “झाडे जगली पाहिजेत, यात दुमत नाही. पण ज्याप्रमाणे झाडाला मिठी मारली जाते, त्याचप्रमाणे बकरीला मिठी मारून तिची कत्तल थांबवून दाखवावी. काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदू धर्मालाच टार्गेट केले जात आहे. यावर प्रश्न विचारणे चूक आहे का? हा भाजप किंवा राष्ट्रवादीचा प्रश्न नाही; मी हिंदू म्हणून प्रश्न विचारतो आहे. मला सांगा, कधी कोणत्या मुस्लीम व्यक्तीने आपल्याच धर्मातील हज यात्रेवर टीका केल्याचे ऐकिवात आले आहे का? पण आमची अमरनाथ यात्रा, कुंभमेळ्यावर हिंदूच प्रश्न उपस्थित करताना दिसतात,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. सयाजी शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, “सयाजी शिंदे यांना सांगा, ईदला किमान पाच बकऱ्यांची कुर्बानी तरी थांबवून दाखवावी. रक्त रस्त्यावर वाहतंय ते थांबवावं, बकऱ्यांना मिठी मारून त्यांना वाचवावं”, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले.
…………….
महाकुंभावेळीही अफवा पसरवल्या
तपोवनातील वृक्षतोडप्रश्नी ते म्हणाले, “समितीने अत्यंत विचारपूर्वक आणि काटेकोर निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्याला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हे मुद्दे उचलले जात आहेत. उत्तर प्रदेशातील महाकुंभाच्या वेळी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता, ‘पाण्याने खाज येते’ अशा अफवा पसरवल्या होत्या. आता झाडांचा मुद्दा काढला जात आहे. हा हिंदूंचे उत्सव बदनाम करण्याचा डाव आहे”, असा हल्लाबोल मंत्री नितेश राणे यांनी केला.



