नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील समस्या सोडवून बकालपणा घालविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून दिली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या मैदानावर बाराही महिने आपणास बकालपणा पहावयास मिळतो. विशेष म्हणजे या मैदानाच्या सुशोभीकरणासाठी, बकालपणा घालविण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काहीही प्रयत्न झालेले नाहीत. स्थानिक रहिवाशांसाठी हे एकमेव मैदान आहे. मैदानात डागडूजी झाली नसल्याने ओबडधोबड भाग, खाचखळगे, कुठे पेव्हर ब्लॉक पडलेले, कुठे मोठ्या दगडी विखुरलेल्या पहावयास मिळतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा बाराही महिने जंगली गवत या मैदानात असतेच. पावसाळा संपल्यावरही जंगली गवत काढले जात नाही. याबाबत कोणी प्रशासनाकडे काही बोलत नाही आणि प्रशासन माहिती असूनही समस्या सोडवत नाही. मैदानाच्या एका बाजूला एव्हरग्रीन सोसायटीकडे जाताना छोटेखानी लोखंडी प्रवेशद्वार होते. ते तुटल्याने नवीन न बसविता अथवा जुन्या प्रवेशद्वाराची डागडूजी न करता तेथे प्लायवूड टाकण्यात आले आहे. आहे तो भाग आणखी काही बकाल कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. मैदानात असलेल्या गटारावरती झाकण असणारे सिमेंटचे ठोकळे निघाले आहेत. त्या खुल्या भागातून गटारामध्ये कचरा साठला आहे. यामुळे मैदान व उद्यानात येणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. मैदानात उंदरांचा सुळसुळाट झाला असून क्रिडागंणाच्या सभोवताली उंदरांनी केलेली अनेक बिळे पहावयास मिळतात. यापूर्वीही या विषयावर आपणास निवेदने दिलेली आहेत. तथापि मैदानातील समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने स्थानिक लोकांसमवेत पालिका विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात जावून आंदोलन करावे लागेल. संबंधितांना या मैदानातील समस्यांचे निवारण करण्याचे, बकालपणा घालविण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.



