नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची राजकीय ताकद व जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आहे. कमी कालावधीतही जनाधार प्राप्त करण्यात संदीप नाईकांची व्यूहरचना यशस्वी ठरत असल्याचे केवळ नवी मुंबईकरांनीच नाही तर महाराष्ट्रानेही मागील विधानसभा निवडणुकीत बेलापुर विधानसभा मतदारसंघात जवळून पाहिले आहे. नवी मुंबई भाजपत अन्य नेत्यांच्या तुलनेत संदीप नाईकांच्या हालचालीकडे व व्यूहरचनेकडे विरोधी पक्षाच्या नजरा खिळल्या आहेत.
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी अखेरची मुदत संपण्यास आता जेमतेम काही तासांचाच कालावधी शिल्लक राहीलेला असतानाच महायुतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने शिवसेना-भाजपमधून निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या अनेक मातब्बरांचा जीव टांगणीला लागला आहे. महायुती झाली तरी मागील सभागृहातील नगरसेवकांचे तिकिट जवळपास निश्चित असल्याने ते काही अंशी निर्धास्त आहेत, तथापि अन्य उमेदवारांच्या तयारीवर पाणी पडण्याच्या शक्यतेने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. महायुतीबाबत तासातासाला नवनवीन चर्चा, अफवांचे पेव फुटत असल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्यांची धावपळ सुरु होते. बोनकोडे, बेलापुर, शिरवणे येथे मिळेल त्या मार्गांने संपर्क करुन खातरजमा करण्यातच भाजपच्या अधिकाधिक मंडळींचा वेळ खर्ची जात आहे. शिवसेनेच्या छावणीतही तीच अवस्था आहे. वाशी ते ऐरोली संपर्क करुन नक्की काय झाले आणि काय होणार आहे, हेच सतत विचारुन स्वत:सोबत कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच घरच्यांचाही रक्तदाब वाढविण्याचे काम इच्छूकांकडून होत आहे.
भाजपच्या छावणीत स्थानिक पातळीवर वनमंत्री गणेश नाईक, बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक या प्रमुख शिलेदारांसह जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, सतीश निकम यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांवर भाजपची भिस्त आहे. नवी मुंबई शिवसेनेतही ठाणेकरांचा विश्वास असलेल्या ऐरोलीतील नेतृत्वाकडून तसेच ठाणेकरांचा कट्टर समर्थक असलेल्या वाशीतील नेतृत्वाकडून मातब्बर इच्छूकांची गर्दी वाढली असली तरी नवी मुंबईवर प्रभाव टाकू शकेल, अशा नेतृत्वाचा अभाव आहे.
संदीप नाईकांच्या भाजपप्रवेशामुळे भाजपची ताकद महापालिका निवडणुकीपूर्वीच वाढीस लागली आहे. संदीप नाईकांकडे स्वत:चा असा पक्षविरहीत व राजकारणविरहीत हक्काचा जनाधार असल्याने त्याचाही भाजप उमेदवारांना फायदाच होणार आहे. संदीप नाईकांनी आपल्या कार्यातून व जनसंपर्कातून तयार केलेला जनाधार हा पक्ष न पाहता केवळ संदीप नाईकांवरच प्रेम करतो, हे मागील विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. केवळ २० दिवसांच्या कालावधीत कमी वेळात ९० हजारांहून अधिक मतदान संदीप नाईकांना झाल्याने बेलापुरमधील भाजप उमेदवारांना त्यांचा फायदाच होणार आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघ हा संदीप नाईकांचे राजकारणातील ‘होमपीच’ मानले जाते. २०१४ ला मोदी लाट सर्वत्र असतानाही संदीप नाईकांच्या ऐरोली गडाला कोणताही हादरा बसला नाही. या विधानसभा मतदारसंघातील जनतेने मोदीरूपी आलेल्या राजकीय त्सुनामीला न जुमानता संदीप नाईकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना विधानसभेत पाठवले होते. संदीप नाईक हे नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक पायपीट केलेले व प्रभागाप्रभागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून सर्वसामान्यांशी संपर्क साधणारे नेतृत्व आहे. संदीप नाईकांच्या कार्यप्रणालीचा, जनसंपर्काचा व राजकीय व्यूहरचनेचा भाजपला ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात फायदाच होणार असल्याने विरोधकांचे सर्व लक्ष संदीप नाईकांच्या हालचालींवर केंद्रीत झाल्याचे पडद्याआडच्या घडामोडीदरम्यान पहावयास मिळत आहे.



