नवी मुंबई : कोरोना काळापासून केवळ सानपाडा नोडमध्येच नाही तर गेली पाच ते सहा वर्षे जनसामान्यांसाठी सर्वांधिक काम करणारे नेतृत्व अशी जनसामान्यांमध्ये प्रतिमा असणारे पांडुरंग विठ्ठल आमले यांचे पालिका निवडणुकीसाठी सानपाडा नोडमधून भाजपने तिकिट नाकारले आणि सानपाडामधील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विधानसभा निवडणुकीत ज्यांनी पक्षाच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले, त्याच पांडुरंग आमलेंना भाजपने तिकिट नाकारले व ज्यांनी विधानसभा निवडणुकीत मंदाताई म्हात्रेंना पर्यायाने भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी जीवाचे रान केले, आज त्याच लोकांना भाजपचे तिकिट मिळालेले पाहून सानपाडा नोडमधील आरएसएसचे कार्यकर्ते, स्थानिक रहीवाशी, भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पक्षाचे काम करणाऱ्यावर अन्याय व विधानसभेला भाजपविरोधी काम करणाऱ्यांना न्याय, असा संतप्त सूर सानपाडा नोडमधील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना काळापासून सानपाडा नोडमध्ये सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारे पांडुरंग आमले हे भाजपचे नेतृत्व आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून भाजपला नावारुपाला आणण्याचे व भाजपचा जनाधार वाढविण्याचे काम पांडुरंग आमले यांनी गेल्या पाच ते सहा वर्षात सातत्याने केले आहे. दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सव, हळदीकुंकुचा मोठा समारंभ, विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन पांडुरंग आमले यांनी भाजपच्या माध्यमातून केले आहे. अनेक नागरी समस्यांचे निवारण केले आहे. सानपाडा नोडमध्ये पक्षसंघटना वाढविण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांचा प्रत्येक शब्द पांडुरंग आमले यांनी झेलला आहे. पाच ते सहा वर्षात भाजपशी कधीही गद्दारी केली नाही व पक्षविरोधी कामही केले नाही. मधल्या काळात भाजपचे अनेक जण राष्ट्रवादीत गेले. तुतारीचा प्रचार करत भाजपविरोधी रान पेटविले. भाजप उमेदवार मंदा म्हात्रेंना पराभूत करण्यासाठी राबले. ज्यांनी भाजप संपविण्याचा प्रयत्न केला, त्यांनाच पालिका निवडणुकीत भाजपने तिकिट दिले आहे. ज्यांनी भाजप वाढविण्याचा प्रयत्न केला त्यांना तिकिट नाकारत भाजप उमेदवार विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आणि आज सानपाडा नोडमध्ये तेच पालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार आहेत.
पांडुरंग आमले यांचे तिकिट कापले जाताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केला. भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याजवळही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भाजपसाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना नाही तर भाजपविरोधी काम करणाऱ्यांना न्याय मिळाला असा संदेश सानपाडा नोडमधील घराघरामध्ये गेला आहे. स्थानिक जनतेच्या आग्रहास्तव पांडुरंग आमले हे निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून सहभागी झाले असून त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार काय प्रचार करणार, विधानसभा निवडणुकीला आपण भाजपविरोधी प्रचार केला होता, हे सानपाडामधील जनतेला कोणत्या तोंडाने सांगणार? असा प्रश्न आता सानपाडामधील रहिवाशीच उपस्थित करु लागले आहेत. सानपाडा नोडमध्ये शिवसेनेचे सोमनाथ वासकर व कोमल वासकर हे तगडे नेतृत्व शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे. त्यांना माजी नगरसेवक दिलीप बोऱ्हाडे यांची काही दिवसापूर्वी साथ लाभली आहे. शिवसेनेच्या या बलाढ्य पॅनलला थोपविण्याची ताकद असणाऱ्या पांडुरंग आमलेंना तिकिट नाकारुन भाजपने एकप्रकारे स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. सानपाडामधील जनतेला चुकीचा संदेश भाजपकडून तिकिटवाटपात गेल्याने याचा फायदा शिवसेनेच्या पॅनलला होणार असल्याचे बोलले जात आहे. पांडुरंग आमले यांनी खुल्या गटातून अर्ज भरला असून त्यांना भाजपच्या मंडळींचे काही ठिकाणी उघडपणे तर काही ठिकाणी पडद्याआडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. पांडुरंग आमले अपक्ष म्हणून विजयी होणार असल्याचा दावा खुद्द स्थानिक रहीवाशांकडून केला जात असल्याने या पॅनलमध्ये भाजपला ही निवडणूक सोप्पी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पॅनलमध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नाही तर त्यांना तिकिट देणाऱ्या नेतृत्वाची प्रतिष्ठाला पणाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.



