जयश्री पाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग २३ मध्ये नेरूळ, जुईनगर, सानपाडा या तीन नोडमधील परिसराचा समावेश होत आहे. या मतदारसंघात भाजप व शिवसेनेतील चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच पक्षाने तिकिट वाटपात डावलले गेलेल्या व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसमधून उभ्या राहीलेल्या सुहासिनी नायडू यांच्या कामगिरीवरही या मतदारसंघातील समीकरणे अवलंबून असणार आहे.
या मतदारसंघात शिवसेनेकडून रंगनाथ औटी, सौ. शशिकला औटी, कामगार नेते रविंद्र सावंत, सौ. साधना बाबाजी इंदोरे यांना तर भाजपकडून काशिनाथ पाटील, विजय साळे, प्रणाली पाटील, उषा यमगर आदी निवडणूक लढवित आहे. तर महाविकास आघाडीकडून विशाल ससाणे, अक्षता शेवाळे, रुचिता पोसम, मनसेचे युवा नेते अभिजित देसाई निवडणूक लढवित आहे. सर्वच गटामध्ये मातब्बर उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय असले तरी भाजपचा निवडणूक रिंगणातला हमखास चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुहासिनी नायडू यांचे केवळ आमदार मंदाताई म्हात्रे या एकमेव निकषावर पक्षाने तिकिट कापले. कामाचा डोंगर उभा केला असतानाही सुहासिनी नायडू यांचे तिकिट कापले गेल्याने प्रभागात एकीकडे आश्चर्य तर दुसरीकडे संतापही व्यक्त केला जात आहे. या प्रभागात पक्षनिष्ठा व कामाचा डोंगर असतानाही नायडू या नावाला जणूकाही ग्रहणच लागले अहो. मनसेतही गेली अनेक वर्षे मनसे स्थापनेपासून संघटनेचे तसेच जनसेवेचे काम करणाऱ्या अनिता नायडू यांचेही तिकिट कापले गेले आहे. मनसे व भाजपात काम करणाऱ्या नायडू या महिलांचे तिकिट कापले गेले असले तरी या मतदारसंघातील निवडणूक समीकरणामध्ये नायडू नावाची व त्यांच्यामागे असणाऱ्या जनाधाराची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
भाजपाची धुरा काशिनाथ पाटील, विजय साळे, शिवसेनेची धुरा रंगनाथ औटी, रविंद्र सावंत, बाबाजी इंदोरे तर महाविकास आघाडीची धुरा विशाल ससाणे, अभिजित देसाई या नावावर अवलंबून असणार आहे. अनिता नायडू यांना मनसेकडून व सुहासिनी नायडू यांची तिकिट न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
राखीव गटामध्ये रविंद्र सावंत, विशाल ससाणे, विजय साळे या होत असलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रविंद्र सावंत यांचा नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड तसेच सानपाडा सेक्टर १० मध्ये असलेला जनसंपर्क व कार्य तसेच कामगार क्षेत्रातील कार्य, स्वत:ची प्रभागात असलेली चार जनसंपर्क कार्यालये, तसेच रंगनाथ औैटी यांचा नेरूळ-जुईनगरमधील जनाधार, सानपाड्यातून बाबाजी इंदोरे यांचा मिळालेला बुस्टर डोस या पार्श्वभूमीवर रविंद्र सावंत यांचे पारडे जड असल्याचे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पहावयास मिळत आहे. सुहासिनी नायडू यांचे तिकिट कापले गेल्याचा फटका काही प्रमाणात भाजपला मिळण्याची शक्यता आहे.



