नवी मुंबई : नेरूळ सेक्टर आठ व दोनमधील राजीव गांधी पुलाखालील श्री गणेश चौकाचे सुशोभीकरण करण्याची लेखी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज चव्हाण यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
श्री गणेश चौकाचा चौथरा उंदरांनी बीळ पाडून मोठ्या प्रमाणावर खराब केला आहे. तसेच त्या परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण अतिशय जास्त असून नागरिकांना व भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यावर व स्वच्छतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. हा चौथरा तातडीने दुरुस्त करून व्यवस्थित करून द्यावा, तसेच संपूर्ण परिसराची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. राजीव गांधी पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये, शिवाजी पार्क, दादर येथे असलेल्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे फायबरचे तैलचित्र महापालिकेमार्फत श्री गणेश चौक, राजीव गांधी पुलाखाली बसवून त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. त्यामुळे परिसरास ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त होईल तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश जाईल. या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी मनोज चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

