जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जेजुरी : श्री क्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पूर्वेकडील पायरी मार्गावर भाविकांनी दर्शनासाठी आणलेले शर्यतीचे दोन बैल उधळल्याने तीन भाविक जखमी झाले. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने पायरी मार्गावर लहान मुले नसल्याने अनर्थ टळला. खंडोबा गडावर शर्यतीचे बैल व घोडे आणण्यास बंदी असतानाही हा प्रकार घडला.
रविवार असल्याने खंडोबा गडावर जाणाऱ्या भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी अकराच्या सुमारास आंबेगाव येथील भाविकांनी दोन शर्यतीचे बैल खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आणले होते. पहिल्या पायरीला दर्शन घेण्याऐवजी या भाविकांनी हे बैल पायरी मार्गावरून वर चढवत नेले. अर्ध्या वाटेवर आले असता दोन्ही बैल अचानक उधळले आणि पायऱ्यांवरून खाली पळत सुटले. काही कळण्याच्या आतच वेगात बैल पायरी मार्गावरून पळू लागल्याने भाविकांसह आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये घबराट निर्माण झाली. घाबरलेले भाविक पळू लागले. या घटनेमध्ये गड चढणारे शिवा भास्कर मोहे (रा. संग्रामपूर जि. बुलढाणा), विशाल रामदास कवळकर (रा. खामगाव जि. बुलढाणा) आणि ज्योती महेश पवार (रा. तिरुपतीनगर, जि. जळगाव) हे भाविक पायरी मार्गावर पडून जखमी झाले. सुदैवाने पायरी मार्गावर लहान मुले नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. जखमी भाविकांवर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जेजुरीच्या खंडोबा गडावर शर्यतीचे बैल व घोडे आणण्यास श्री मार्तंड देवस्थानने दोन वर्षांपूर्वीच बंदी घातली आहे, तशा आशयाचे फलक सर्व रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. यापूर्वी बैलाने लाथ मारल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर देवस्थानने गडावर बैल व घोडे आणण्यास मनाई केली आहे. रविवारी आलेल्या भाविकांना आजूबाजूच्या दुकानदारांनी गडावर बैले नेऊ नका असे सांगितले होते. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून भाविकांनी बैलांना पायऱ्या चढायला लावल्या. त्यामुळे हा अपघात घडला. खंडोबा गडाच्या मुख्य नंदी चौकातसुद्धा गर्दीत अनेक जण बैल जोड्या घेऊन येतात. बैलांच्या अंगावर भंडार उधळतात. डोळ्यात भंडार गेल्याने बैल उधळण्याचे प्रकार घडतात.
बैलांच्या शर्यतीवरील बंदी उठल्याने राज्यातील अनेक भागात शर्यती सुरू असतात. भाविक शर्यतीचे बैल जेजुरीला खंडोबा दर्शनासाठी आणतात. मात्र, त्यातून अनेक वेळा गंभीर प्रकार घडतात. दोन वर्षांपूर्वी गडावर बैल व घोडे आणण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता बैल, घोडे गडावर गडावर येत नाहीत. मात्र, तरीही काही बैलांचे मालक हट्टीपणाने पायऱ्यावरून बैल चढवत वर नेण्याचा प्रयत्न करतात. यातूनच अपघात होतात .भाविकांनी बैल व घोडे गर्दीत आणण्याचा हट्टीपणा करू नये, असे आवाहन मंगेश घोणे, मुख्य विश्वस्त, श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी यांनी केले आहे.
