एमआयएमचे युवा नेते हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई : दिव्यांगाना होणारा त्रास टाळण्यासाठी ग्रामीण तालुक्याच्या ठिकाणी व शहरी भागात मध्यवर्ती ठिकाणी दिव्यांग दाखला आठवड्यातून एकदा मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी निर्देश देण्याची मागणी एमआयएमचे युवा नेते व कोकण, नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे. सुविधा मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा लागत आहे. आधीच दिव्यांग त्यात पाठपुरावा करण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सरकारकडून जिल्हा रुग्णालयात दिव्यांगाची वैद्यकीय तपासणी झाल्यावर दिव्यांगाचा दाखला दिला जातो. मात्र तपासणी झाल्यावर दिव्यांग प्रमाणपत्र हातात पडेपर्यत दिव्यांगाना हेलपाटे मारावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो. केंद्र व राज्य सरकारकडून दिव्यांग व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना दिव्यांगांचा दाखला आवश्यक असतो. जिल्हा रुग्णालयात ये-जा करण्यासाठी त्यांना मानसिक व आर्थिक नुकसान सांभाळावे लागते, परंतु शरीराचेही हाल खुप होतात. याप्रकरणी राज्य सरकारने तपासणी झाल्यावर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून अवघ्या आठवडाभरात घरपोच दिव्यांगाचा दाखला मिळेल, अशी व्यवस्था करुन दिव्यांगाना दिलासा देणे आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयात तपासणी झाल्यावर तालुक्याच्या ठिकाणी तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व अन्य महापालिका कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी तपासणी करण्याचे व दिव्यांग दाखला तीन ते चार दिवसांत उपलब्ध करुन देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी केली आहे.
