नवी मुंबई : राज्यात शहरी व ग्रामीण भागात कर्करोगविरोधी अभियान राबविण्याची लेखी मागणी एमआयएमचे युवा नेते व नवी मुंबई, कोकण विभागाचे प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. पूर्वीच्या तुलनेत हा आलेख वाढतच चालला आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कर्करोगविरोधी लढा न उभारल्यास नजीकच्या काळात महाराष्ट्र राज्य कर्करोगाचे माहेरघर म्हणून ओळखले जाण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामपंचायत ते महापालिका, पंचायत समिती ते जिल्हा परिषदा सर्वत्रच आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात कर्करोग तपासणी शिबीर व कर्करोग उपचार शिबीर राबविणे काळाची गरज आहे. शहरातील चौकापासून शेतकऱ्याच्या बांधापर्यत या अभियानाची व्याप्ती वाढली पाहिजे. राज्याच्या आरोग्य विभागाला कर्करोगविरोधी अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाज खान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
