मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याने हे राज्यासाठी मोठे यश असल्याचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून झालेल्या या भव्य गुंतवणुकीबद्दल त्यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले.
विधानभवन, मुंबई येथे सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विधानपरिषद सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सत्र पार पडले. या चर्चेदरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे विभागात झालेल्या गुंतवणुकीचा विशेष उल्लेख केला. दावोस येथील गुंतवणुकीची चर्चा नेहमीच होते; मात्र इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधून महाराष्ट्रासाठी झालेली ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही राज्याच्या आर्थिक विकासाला नवे बळ देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये गोरेगाव (नेस्को) येथे पार पडलेल्या इंडिया मेरिटाईम समिटमध्ये देश-विदेशातील गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत बंदरे, जलपरिवहन, लॉजिस्टिक्स व किनारपट्टी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार करण्यात आले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंदरे खात्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांची आणि गुंतवणुकीची दखल घेत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन केले.


