क्रिडा क्षेत्रात सध्या टी २० विश्वचषक सुरु असून ही स्पर्धा संपताच आयपीएल स्पर्धा सुरु होईल. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा अन्य देशांसोबत स्पर्धा खेळण्यात व्यस्त होईल. सध्या क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक आधीच ठरत असल्याने खेळाडूदेखील वर्षभर आपणास व्यस्त असलेले दिसून येतात. आपल्या देशामध्ये अन्य खेळांच्या तुलनेत क्रिकेट खेळाला अधिक महत्व दिले जात आहे. क्रिकेट खेळ हा जगाच्या पाठीवर मोजक्या देशांमध्येच खेळला जात असला तरी आपण व अन्य आशियाई देशांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता वादातीत आहे. युरोपिय राष्ट्रांमध्ये फुटबॉल सर्वांधिक लोकप्रिय असून त्याखालोखाल टेनिसचा चाहता वर्ग आहे. आपल्या देशाचा एकेकाळी हॉकी हा राष्ट्रीय खेळ होता. परंतु १९८३च्या विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकल्यानंतर हॉकीची पिछेहाट झाली आणि खेळामध्ये सर्वोच्च स्थानी क्रिकेट विराजमान झाला. क्रिकेटपाठोपाठ फुटबॉल, हॉकी, टेनिस, बुद्धीबळ, नेमबाजी व अन्य खेळांमध्ये आपल्या देशातील खेळाडू चमकत असले तरी ते प्रमाण व त्यांची कामगिरी ही धुमकेतूसारखी आहे. अनेक स्पर्धांमध्ये ऐनवेळी खेळाडू अनफिट होतात, स्पर्धा सुरु होण्याअगोदरच खेळाडू आजारी पडल्याने स्पर्धेला मुकतात, अशा घटनाना घडताना पहावयास मिळतात. खेळाडू अनफिट ठरल्यास खेळाडूचे तर आर्थिक नुकसान तर होतेच, पण त्याहूनही अधिक नुकसान हे देशाचे होत असते. कारण त्या खेळाडूवर देशाने गुंतवणूक केलेली असते, अनेक भारतीयांच्या आशा त्या खेळाडूच्या खेळावर लागलेल्या असतात. पूर्वीच्या खेळाडूंच्या तूलनेत आताचे खेळाडू झटपट श्रीमंत होत आहे. बीसीसीआय हे क्रिकेट खेळातील जगातील सर्वांधिक श्रीमंत संस्थान आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशातील खेळाडूंना सामना खेळण्याचे तसेच कराराचे पैसे प्रचंड मिळत असतात. आयपीएलसारख्या स्पर्धांनी त्यात आणखी भर पाडली आहे. खेळाडू अनफिट का होतात? आजारी का होतात? याचा विचार केल्यास पैसा कमविण्याच्या नादात स्पर्धा खेळण्याचा अतिरेक होतो. शरीरावर ताण पडतो. त्यात वेळीअवेळी होणाऱ्या पार्ट्या, जाहिराती करणे, शुटींग करणे, अनेक उद्घाटनामध्ये व्यस्त राहणे यामध्ये त्यांना स्पर्धा खेळण्यापूर्वी आराम करण्याचे, फिटनेसकडे लक्ष पुरविण्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. किंबहूना येणाऱ्या लक्ष्मीचे स्वागत करण्याच्या नादात ते व्यस्त असल्याने व्यायामासाठी, खेळाच्या सरावासाठी त्यांना वेळ मिळत नसावा. आता कसोटी सामने पाहिल्यास तीन ते चार दिवसांमध्ये कसोटी सामन्यांचा निकाल लागताना दिसतो. कसोटी सामन्यांमध्ये दिवसाला ९० षटकांचा खेळ खेळावा लागतो. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, संजय मांजरेकर, व्ही.व्ही. एस लक्ष्मण, राहूल द्रविड, सचिन तेंडूलकर अशा अनेक भारताच्या खेळाडूंची एक नव्हे दोन दिवस खेळपट्टीवर उभे राहण्याची क्षमता होती. सुनील गावसकरसारखा खेळाडू एकेकाळी विना हेलमेट फलंदाजी करताना वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्याचा सामना करताना एक-दोन दिवस नेहमी खेळपट्टीवर चिवटपणे ठाण मांडून बसायचा. सुनिल गावसकर, लक्ष्मण, राहूल द्रविड या खेळाडूंना पोलादी भिंत म्हणून संबोधले जायचे. पूर्वीच्या काळी एकदिवसीय सामने ६० षटकांचे असायचे. त्या सामन्यांमध्येही खेळाडू विकेट न टाकता शेवटपर्यत खेळायचे. अर्थांत आता काळ बदलला आहे. खेळामध्ये पैसा आल्याने व खेळाडूही मुबलक झाल्याने संघामध्ये स्थान टिकविण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ एक स्पर्धा होत असल्याने खेळाचाही अतिरेक होत आहे. स्पर्धेला मुकल्यास व आपल्याजागी सहभागी होणाऱ्या खेळाडूने चांगली कामगिरी केल्यास संघातून आपले स्थान गमविण्याचीही टांगती तलवार खेळाडूंवर असते. त्यामुळे ते आराम न करता सतत स्पर्धा खेळण्याचा व संघात राहण्याचा प्रयत्न करतात. पूर्वीच्या काळी अधिकाधिक संघांमध्ये रोटेशन पद्धतीने संघनिवड केली जायची. खेळाडूंना व्यवस्थापणाकडून जाणिवपूर्वक विश्रांतीही दिली जात असे. त्यामुळे खेळाडू पुढच्या स्पर्धांमध्ये नव्या उत्साहाने सहभागी होत असे. त्यांच्यामध्ये फिटनेसची समस्या निर्माण होत नसे. परंतु आता खेळाडूंच्या नावलौकीकापुढे, त्यांना असलेल्या वलयामुळे व त्यांच्या खेळामुळे त्यांना विश्रांतीसाठी संघातून वगळण्याचे धाडसही अलिकडच्या काळात संघ व्यवस्थापनाकडेही राहीलेले नाही. परिणामी सततच्या स्पर्धा, वेगवेगळ्या देशातील दौरे, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्याचा दबाव यामुळे खेळाडूंचे फिटनेसकडे कानाडोळा होतो. अखेर व्हायचे तेच होते. रबर अधिकाधिक ताणला की तुटतो. नेमके तेच होते. फिटनेस नसला की खेळाडूंना कधी कसोटीतून तर कधी टी-२०तून निवृत्ती घ्यावी लागते. अलिकडच्या काळात पूर्ण खेळातून निवृत्ती न घेता खेळाच्या ठराविक प्रकारातून निवृत्ती घेवून मोजक्याच पॅटर्नमध्ये खेळायचे, हा नवीन ट्रेड रुजू झाला आहे. कोहली-शर्मा हे त्याचेच उदाहरण आहे. पुर्वीच्या काळी खेळाडू चाळीशीपर्यंतही दमदार खेळी करत असत. आताचे खेळाडू जेमतेम पस्तिशीतच निवृत्ती घेताना समाधान मानत आहे. अर्थांत पस्तिशीमध्येदेखील त्यांनी आपल्या पुढच्या १५ ते २० पिढ्यांच्या पोटापाण्याची तरतूद केलेली असते. पूर्वीच्या काळात खेळामध्ये पैसा नव्हता, आता पैसा मुबलक आला आहे. त्यामुळे पूर्वीचे खेळाडू खेळातील त्यांच्या ‘क्लास’मुळे ओळखले जायचे. त्यांच्या फटक्यांची, क्षेत्ररक्षणाची चर्चा आजही होत असते आणि आजच्या खेळाडूंकडे गाड्या किती महागड्या आहेत, त्यांची मालमत्ता याची चर्चा होत असते. मोहम्मंद अजहरउद्दीन मॅचफिक्सिंगमुळे बदनाम झाला असला तरी तो आजही त्यांच्या मनगटी खेळामुळे व क्षेत्ररक्षणामुळे ओळखला जातो. रॉबिनसिंग, एकनाथ सोलकर हेदेखील खेळाडू त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळे ओळखले जातात. दक्षिण आफ्रिकेच्या जॉटी ऱ्होडसची तुलना आजही कोणाबरोबर होवू शकत नाही. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना आहे, हे खेळाडूंना व संघव्यवस्थापणालाही कोणीतरी पटवून देण्याची वेळ आली आहे. खेळाडूंना सतत खेळण्यास भाग न पाडता रोटेशन पद्धतीने त्यांना विश्रांती देवून अन्य खेळाडूंनाही संधी देण्याची गरज आहे. आयपीएल स्पर्धेमुळे अनेक नवनवीन खेळाडू सहज उपलब्ध होत आहे. स्थानिक स्पर्धांनाही चांगले मानधन मिळत आहे. खेळाडूंचा शारीरीक व्यायाम व फिटनेस अधिकाधिक चांगला असणे, त्यांच्यासाठी व देशासाठीही आवश्यक आहे. फिटनेस राहीला तरच ते खेळामध्ये टिकून राहतील.
- सुवर्णा खांडगेपाटील
- संपादक

