सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग २२ मधील रहिवाशांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांचे तातडीने निवारण करुन त्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयात जावून समस्यांचा पाढा वाचत समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याची आग्रही भूमिका मांडली.
गणेश कृपा, शिवकृपा, गुरुकृपा आणि सप्तर्षी या सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. वरील सोसायट्यांच्या मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे. सोसायट्यांच्या परिसरातील झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पावसाळ्यात किंवा वाऱ्यामुळे या फांद्या पडून जीवितहानी होण्याचा धोका आहे. महापालिकेकडून याची तातडीने छाटणी होणे आवश्यक आहे. सेक्टर १० येथील फुटपाथवरील झाडांचे संरक्षक कठडे तुटले असून झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आहेत.
साईकृपा, ज्ञानदीप, सरस्वती आणि लक्ष्मी सोसायटी दरम्यान असलेल्या विद्युत महामंडळाच्या पॉवर स्टेशनच्या बाजूला झाडे-झुडपे वाढली आहेत. तिथे कचरा साचल्याने उंदीर आणि सापांचा प्रादुर्भाव वाढला आहे, जे आजूबाजूच्या सोसायट्यांसाठी धोकादायक आहे.
सेन्सरी गार्डन येथील शौचालय अस्वस्च्छ असून तिथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच, येथील जॉगिंग ट्रॅक उखडून ३-४ महिने झाले तरी त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
जुईनगर रेल्वे स्थानक आणि सानपाडा डी-मार्ट यांच्या दरम्यान असलेला हायमास्ट दिवा गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या परिसरामध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी हा दिवा बंद असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर अंधार असतो, ज्यामुळे खालील समस्या उद्भवत आहेतः सेक्टर १० कडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव आहे. अनेक दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगलमूर्ती सोसायटी व अष्टविनायक सोसायटीच्या मध्ये असलेली मोकळी जागा सिडकोच्या अखत्यारीत येते. काही काळापूर्वी सिडकोने या जागेला पत्रे लावून बंद केले आहे. मात्र, त्यानंतर या जागेची योग्य निगा राखली गेलेली नाही. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रानटी झाडे आणि झुडपे वाढली आहेत आदी समस्यांचा पाढा नगरसेवक अभिजित देसाई यांनी महापालिका अधिकाऱ्यांपुढे वाचला आहे.
यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे साप आणि उंदरांचा वावरः वाढलेल्या झुडपांमुळे या जागेत साप आणि मोठ्या उंदरांनी आश्रय घेतला आहे, जे अनेकदा सोसायट्यांच्या आवारात शिरतात. यामुळे रहिवाशांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी अस्वच्छता आणि झाडोरा असल्यामुळे डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने वरील सर्व तक्रारींची दखल घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक अभिजित देसाई यांनी यावेळी केली.


