आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे अंतिम परिणाम जाहीर होण्यास अजून काही कालावधी जाईल, पण जोपर्यंत युद्ध सुरु राहील, तोपर्यंत भारतातील सर्वसामान्यांचे, गोरगरीबांचे वाढलेल्या महागाईमुळे कंबरडे मोडलेले असेल. प्रत्येक गोष्टीवर या युद्धरुपी महागाईचे पडसाद उमटलेले असतील. बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्यास महागाई वाढते, मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यास स्वस्ताई होते, हे बालपणापासून शिकविण्यात आले आहे, मनावर बिंबविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र एकदा महागाई वाढली की वस्तुचा पुरवठा वाढला तरी महागाईचा आलेख कमी होत नसल्याचे अनुभवाअंती शिकावयास मिळते. पुस्तकी माहिती मनावरुन विस्मृतीत जाते, पण अनुभवाने मिळालेले मनावर कायमचेच कोरले जाते. वस्तूंचा पुरवठा मुबलक असला तरी वस्तूंची बाजारातील आवक कमी केल्यास किंमती आपोआप वाढतात, हे व्यापारी गणित स्वार्थासाठी प्रत्येक वेळी वापरले जाते आणि महागाईच्या नावाखाली ग्राहकाला अक्षरश: पिळून काढले जाते. कोरोना काळातही वस्तू मुबलक असताना महागाई वाढली होती. आता तर आखाती देशातील युद्धामुळे गॅस, पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. हॉटेल्स बंद पडू लागली आहेत, जी हॉटेल्स चालू आहेत, त्यातील पदार्थ कमी होवू लागले आहेत. खाद्यपदार्थांच्या गाड्यांना गॅस न मिळाल्यास रस्त्यावरच्या गोरगरीबांना भुकबळीचाही सामना करावा लागेल. दररोज मजुरीवर काम करणारे व झोपड्यांमध्ये राहणारे हातगाडीवरचे खावूनच आपली भूक भागवित असतात. इंधनामध्ये दरवाढ झाल्यास प्रत्येक वस्तूवर त्याचे पडसाद उमटतात व महागाई वाढते. वस्तूंचे भावही नकळत वाढतात. रमजान असतानाही आखाती देशामध्ये युद्धामुळे फळांची निर्यात थांबलेली आहे म्हणून ग्राहकांना स्थानिक बाजारांमध्ये फळे स्वस्तात उपलब्ध झाली आहेत का? नाही ना. बाजारात पुरवठा वाढला तरी व्यापारी वर्ग आपला नफा आज कमी करण्यास तयार नाहीत. मुळातच किंमती वाढवून कमी करण्याचे औदार्य दाखवून ग्राहकांना भुलविण्याचे उद्योग अनेक वर्ष सुरुच आहेत. आजही व्यापारी प्रवृत्तींना आखाती युद्धाचे आयते कोलित सापडले आहे. वस्तूंचा तुटवडा असला तरी दोन पैसे जास्त दिल्यावर वस्तू आपोआप उपलब्ध होतात. कोणतेही संकट येण्यापूर्वी अफवा सुटतात. या अफवा सोडण्याचे षडयंत्र असते. अफवांमुळे भारतीय लोक कोणतीही खातरजमा न करता साठा वाढविण्याला प्राधान्य देतात, गरज नसतानाही साठा करुन ठेवतात, परिणामी बाजारात तुटवडा होवून दरवाढ होते आणि एकदा दरवाढ झाली की ती कधीही कमी होत नाही, त्याचे परिणाम आपणाला कायमस्वरुपी भोगावे लागतात.
केंद्र सरकार व राज्य सरकार गॅस मुबलक असल्याचा टाहो फोडत असले तरी हॉटेल्स का बंद पडू लागली आहेत, रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद करण्याची वेळ का आली? गॅसटंचाई संपुष्टात न आल्यास अनेकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण होवू शकतो. अनेक ठिकाणी घरातून समोसे, वडे, भजी बनवून आणून हातगाडीवर विकण्याची वेळ आलेली आहे. जिथे महानगर गॅसची घरामध्ये पाईपचा गॅस आहे, तिथे शक्य आहे, पण जिथे गॅसची टाकी आहे, तिथे हा खेळ जास्त दिवस चालणार नाही. परिणामी गॅसचा काळाबाजार वाढणार. हॉटेलचालक, हातगाडीवर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारे घटक व्यवसाय टिकविण्यासाठी मिळेल त्या दराने गॅसच्या टाक्यांची खरेदी करतील, परिणामी गॅसच्या काळावाजाराला चालना मिळेल.
सौ. सुवर्णा खांडगेपाटील
- संपादक

