महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मागणी
सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सभागृहात ठोक मानधनावरील कर्मचारी यांच्या कायम सेवेचा प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावाबद्दल महापालिका प्रशासनाचे अभिनंदन. तथापि राज्य सरकारकडे ठराव जातात, पण कधी ते संमत होतात, कधी लाल फितीच्या कारभारात रेंगाळतात, तर कधी फेटाळले जातात. या ठरावाची अंमलबजावणी होईल, तेव्हा होईल. तुर्तास ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.
कंत्राटी संवर्गातील कर्मचाऱ्यांची व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची कायम सेवा हा संबंधित कर्मचाऱ्यांसाठी भावनिक विषय आहे. या विषयावरुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची या विषयावरुन आजतागायत फसवणूकच केलेली आहे. नवी मुंबई महापालिकेचे पाचवे सभागृह संपत आले असताना २०१५ साली आता भाजपमध्ये असलेल्या व त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व नेतेमंडळींनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम झाल्याचे सांगितले. शहरात बॅनर लागले. नेतेमंडळींचे अभिनंदनही करण्यात आले. परंतु या कर्मचाऱ्यांची सेवा आजही कायम झालेली नाही. त्यामुळे सेवा प्रामाणिकपणे कायम करा. श्रेयही तुम्हीच घ्या, पण या विषयावरुन संबंधित कर्मचाऱ्यांची दिशाभूल करु नका, यापूर्वी झाली तशी आताही फसवणूक करु नका, असे कळकळीचे आवाहन कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.
सभागृहात ठोक आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रस्ताव सभागृहात आला आहे, तो मंजुरही होईल. नवी मुंबई महापालिकेत, राज्यात तसेच केंद्रातही भाजपची सत्ता आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजुर करुन आणणे आवश्यक आहे. राज्यपातळीवर शिवसेनेकडून सहकार्य केले जाईल. यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीत असताना कधीही मंजुर करुन घेतला नाही. व्यासपिठावर आणला नाही. आता भाजपच्या नेतेमंडळींना कंत्राटी व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचा पुळका आला आहे. या कर्मचाऱ्यांबद्दल भरभरुन बोलले जात आहे. पण महापालिका आस्थापनेच्या स्थापनेपासून हे कर्मचारी सेवा कायम नसतानाही काम करत आहेत. मग इतके दिवस भाजपच्या नेतेमंडळींना हे कर्मचारी व त्यांचे काम दिसले नाही का? आजच त्यांच्या कामाची प्रशंसा का होत आहे? खरोखरीच प्रेम आले असेल तर पुन्हा तुमचे अभिनंदन. पण आता विषय हाती घेतलाच आहे तर या कर्मचाऱ्यांची सेवा कायम करुनच दाखवा. अभिनंदनाचे फलक आम्ही लावू. तुम्हाला पेढे भरवायला आम्ही पुढे येवू. ठराव मंजुर करणे व त्यास राज्य सरकारकडून मंजुरी आणणे या प्रक्रियेत काही कालावधी जातो. ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी संवर्गातील कर्मचारी आजही तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. महागाई वाढत चालली आहे. वेतनवाढ हा महापालिकेच्या अखत्यारीतील विषय आहे. प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी संबंधित दोन्ही संवर्गातील कर्मचाऱ्यांची तातडीने वेतनवाढ करुन त्यांच्या आर्थिक समस्येचे निवारण करावे. कर्मचारी वेतनवाढप्रकरणी शिवसेनाही तुम्हाला सहकार्य करेल. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सातत्याने कर्मचारी हिताची भूमिका घेतलेली आहे. घोषणाबाजी करुन फसवणूक करण्याचे व सहानुभूती मिळवण्याचे उद्योग कधीही एकनाथ शिंदेसाहेब यांनी केले नाहीत. त्यांनी अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम केली असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
सभागृहात कायम सेवेचा ठरावाबाबत पुन्हा एकवार अभिनंदन. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही समान कामाला समान न्याय हा ठरावही सभागृहात मंजूर करुन घ्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या. सेवा कायम होईल, तेव्हा होईल. आज या दोन्ही संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीची गरज आहे. पण खरोखरीच कंत्राटी तसेच ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांवर प्रेम असेल तर सर्वप्रथम या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ तात्काळ करावी व आपले या कर्मचाऱ्यांवर पुतना मावशीचे प्रेम नाही, हे सिद्ध करावे, असे आवाहन कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केले आहे.
१४ फेब्रुवारी २०२३ रोजी ठोक मानधनावरील केवळ १० कर्मचाऱ्यांची वेतनवाढ केली. तसेच ठोक मानधनावरील अभियंत्यांची वेतनवाढ केली. याच कर्मचाऱ्यांवर कृपादृष्टी का? बाकीच्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची वेतन वाढ का केली नाही. माजी खासदारांना या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करताना अन्य ठोक मानधनावरील कर्मचारी दिसले नाही काय? ठराविक लोकांना वेतनवाढ आणि अन्य कर्मचाऱ्यांकडे कानाडोळा हा काय प्रकार आहे? कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सेवा नाही. मेडिक्लेम नाही, ईएसआय सुविधा नाही. सेवा कायम करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करा, आरोग्यविषयक सुविधा द्या, अशी मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केली आहे.

