आग्रोळी गावातील नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन मनःपूर्वक मानले आभार
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@com
नवी मुंबई : गोर गरीब दिनदुबळ्यांच्या हाकेला धावणारी, जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारी, आपली लढवय्यी नेत्या आमदार मंदाताई म्हात्रे! या नेहमीच आपल्या बेलापूर मतदारसंघातील प्रश्न शासन दरबारी मांडत असतात. त्याच बरोबर दिलेल्या शब्दाला जागणारी आणि हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्णत्वास नेणारी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कार्य नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्याच बरोबर आग्रोळी गावातील संकट मोचन हनुमान मंदिर सभा मंडपाच्या लोकार्पणाच्या वेळी आग्रोळी ग्रामस्थांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मागणी केली होती की असाच सभा मंडप आग्रोळी गावातील श्री अमृतेश्वर मंदिर सभोवती झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आग्रोळी गावातील श्री अमृतेश्वर मंदिराच्या सभा मंडपासाठी ५० लाख रुपयांचा आमदार निधी त्वरित मंजूर करून दिल्याबद्दल गावातील नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेऊन मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
आग्रोळी गाव हे सांस्कृतिक व धार्मिक परंपरांनी समृद्ध असून, श्री अमृतेश्वर मंदिर हे ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान आहे. मंदिर परिसरात सभा मंडपाची आवश्यकता अनेक दिवसांपासून जाणवत होती. विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच गावातील महत्त्वाच्या बैठका आयोजित करण्यासाठी सुसज्ज जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला.
तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, या सभा मंडपामुळे आग्रोळी गावातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रम अधिक सुव्यवस्थितपणे पार पडतील व शिव भक्तांचे उन्हाला, पावसाळयापासून सरंक्षण होणार आहे. त्याच बरोबर महाशिवरात्री निमित्त देखील शिव भक्तांना सभा मंडपाचा मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच गावाच्या विकासातही याचा मोठा हातभार लागणार आहे.
तसेच आग्रोळी गावातील समाज मंदिर शेजारील ब्रिजखाली सरंक्षण भिंत बांधणे व गेट बांधून प्रशस्त करणे, संगम अपार्टमेंटच्या बाजूला समाज मंदिर उभारणे तसेच अमृतेश्वर मंदिराच्या बाजूची विहिरीतील गाल काढून स्वच्छ करणे, समाज मंदिर येथे रात्रीची पोलीस गस्त वाढविणे अशा विविध कामे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समोर ग्रामस्थांनी मांडल्या व उपस्थित अधिकाऱ्यांना त्वरित काम पूर्ण करण्याचे आदेश दिले व सीबीडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून आग्रोळी येथे पोलीस गस्त वाढविण्यास सांगितले. त्यामुळे “स्थानिक नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे हीच माझी भूमिका आहे असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. आग्रोळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.”
या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत आग्रोळी गावातील दिलीप वैद्य, राजेश पाटील, श्याम पाटील, गजानन पाटील, सुधीर पाटील, निलेश पाटील व अधिकारी उपस्थित होते.



