संदीप खांडगेपाटील यांचे महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री यांना निवेदन सादर
नवी मुंबई : सारसोळे गावातील प्रवेशद्वारालगत सुरु होणाऱ्या कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती करुन अंधाराच्या समस्येचे निवारण करण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सारसोळे गावातील प्रवेशद्वारापासून (वेस) कै. बुध्या बाळ्या वैती मार्ग सुरु होतो. या मार्गावरुन आपणास सारसोळे गावात तसेच सेक्टर सहा परिसरात ये-जा करता येते. सारसोळे गावातील ग्रामस्थांची तसेच सेक्टर सहामधील रहिवाशांची या मार्गावरुन सकाळ-रात्री उशिरापर्यत वर्दळ सुरु असते. सारसोळेचे ग्रामस्थ मासेमारी करण्यासाठी भरती-ओहोटीचे गणित सांभाळून भल्या पहाटे, दिवसा अगदी मध्यरात्रीही या मार्गावरुन ये-जा करत असतात. गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद पडल्याने या मार्गावर सांयकाळपासून दिवसाचा सूर्य उगवेपर्यत अंधारच असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या अंधारात महिलांची छेडछाड, विनयभंग अथवा अत्याचार घडण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता सारसोळे प्रवेशद्वारालगतच सुरु होणाऱ्या कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील बंद पडलेले पथदिव्यांची दुरुस्ती करुन तेथील अंधाराची समस्या संपविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

