नवी मुंबई : हिंदू धर्माची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी, समाजात ऐक्य-जागरुकता, संघटन निर्माण करण्यासाठी सानपाडा येथे सकल हिंदू समाजाकडून आयोजित करण्यास आलेल्या विराट हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सानपाडा सेक्टर ७, ८ मधील गणेश मंदीर वस्ती, सानपाडा, संत गाडगेबाबा खेळाचे मैदान येथे या विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी भूषविले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सायंकाळी ६ ते ६.४५ या वेळेत वातावरण निर्मिती व जनजागरणासाठी प्रेरणादायी हिंदुत्व गीत / देशभक्ती गीत, उपस्थित बांधवांचे स्वागत, राष्ट्रपुरुष वेशभूषा स्पर्धा, लहान मुलांकडून घोषवाक्ये / जयघोष आदी कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी ६:४५ ते ७ या १५ मिनिटांच्या कालावधीत भारतमातेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सायंकाळी ७ ते ७.३० या वेळेत पंचपरिवर्तन या विषयावर विवेकानंद केंद्र नवी मुंबईच्या संयोजिका डॉ. सौ. वंदना महाजनी यांचे व्याख्यान झाले. सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज- अफजलखान वध पोवाडा सादर करण्यात आला. सायंकाळी ८ ते ८.२० या २० मिनिटाच्या कालावधीत सानपाडा महासंघाचे अजय पवार यांनी स्थानिक विषय व समस्यांची मांडणी केली. सायंकाळी ८.२० ते ८.५० या ३० मिनिटाच्या कालावधीत बजरंग दलाचे नवी मुंबई जिल्हा संयोजक शंकर सकपाळ यांनी हिंदू समाज जागरण व संघटन काळाची गरज या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. सायंकाळी ८.५० ते ९ या १० मिनिटाच्या कालावधीत हिंदुत्व रक्षण प्रतिज्ञा व मंत्र, हिंदुत्व निरंतर स्मरण, आचरण व रक्षण घेण्यात आले. या कार्यक्रमास माथाडी नेते, माजि आमदार व मराठा महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व सानपाडा नोडमधील नगरसेवक, माजी नगरसेवक, पक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस पांडुरंग आमले यांनी उपस्थितांचे आभार मानले, त्यानंतर सर्वांनी वंदे मातरमच्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली.
