नवी मुंबई : सानपाडा नोडमध्ये गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत आवारात धुरीकरण करण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
आता पावसाळा कोणत्याही क्षणी सुरु होईल. पावसाळ्यात डासांची घनता वाढीस लागते. नवी मुंबई शहराची निर्मिती व विकसिकरणाची प्रक्रिया खाडीअंर्तगत तसेच खाडीशेजारील भागात झालेली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना बाराही महिने डासांचा पर्यायाने साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर नवी मुंबईत साथीच्या आजारांचा उद्रेक होतो. पावसाळा कालावधीत महापालिका प्रशासन सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करत नाही. त्यामुळे आपण पावसाळा सुरु होण्यापूर्वीच सानपाडा कॉलनी, सानपाडा गाव, सानपाडा पामबीच परिसर येथील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण अभियान राबवावे, गटारांमध्ये अळीनाशके टाकण्यात यावी. सानपाडावासियांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिका प्रशासनातील संबंधितांना सानपाडा नोडमधील गृहनिर्माण सोसायटीच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
