युवा सेनेचे सरचिटणिस निखिल मांडवे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई: शहराच्या उभारणीसाठी आपल्या जमिनी देणाऱ्या मूळ २९ गावांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे जतन करण्यासाठी युवासेना नवी मुंबई सरचिटणीस निखिल रतन मांडवे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचा संदर्भ देत, नवी मुंबई महापालिकेने या २९ गावांमधील मुख्य गावकीच्या (ग्रामदैवत) मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी प्रति मंदिर ५० लाख रुपयांचा विशेष विकास निधी मंजूर करावा, अशी मागणी निखील मांडवे यांनी नवी मुंबई मनपा आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
१७ डिसेंबर १९९१ रोजी नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली, तेव्हा यात भूमिपुत्रांच्या मूळ २९ गावांचा समावेश करण्यात आला होता. या गावातील स्थानिक बांधवांनी दिलेल्या त्यागावरच आजचे आधुनिक नवी मुंबई शहर उभे राहिले आहे. या प्रत्येक गावाचे एक पारंपरिक ‘गावकीचे मंदिर’ असून ते गावच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचे मुख्य केंद्र असल्याचे सांगत युवा सेनेचे जिल्हा सरचिटणिस निखिल मांडवे यांनी अनेक मंदिरांची बांधकामे जुनी झाली असून, तिथे येणाऱ्या भाविकांसाठी सभामंडप, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण आणि वार्षिक देखभालीची अत्यंत आवश्यकता आहे. ज्या भूमिपुत्रांच्या त्यागावर हे शहर उभे राहिले, त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकभावनेचा आदर करत मनपाच्या आगामी निधीमध्ये (बजेट) योग्य ती आर्थिक तरतूद करण्यात यावी. संबंधित विभागाला या मंदिरांचे तात्काळ सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
ज्या भूमिपुत्रांनी शहरासाठी आपले सर्वस्व दिले, त्यांच्या अस्मितेचे रक्षण झालेच पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेला गती देत, मनपा आयुक्त यावर सकारात्मक निर्णय घेतील आणि भूमिपुत्रांच्या श्रद्धास्थानांना न्याय देतील, अशी मला पूर्ण खात्री आहे, असा आशावाद निखिल मांडवे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
