माथाडी नेते पांडुरंग आमले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील धोकादायक ठरलेल्या कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा–बटाटा, फळ, भाजी, धान्य आणि किराणा मार्केट कार्यरत असून त्यापैकी कांदा–बटाटा मार्केट अडीच दशकांपूर्वीच धोकादायक घोषित करण्यात आले आहे. या मार्केटमध्ये व्यापारी, मेहता, वाहतूकदार, स्थानिक वाहतूकदार, माथाडी, मापाडी, वारणार, पालावाले, शेतकरी, खरेदीदार तसेच बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २५ ते ३० हजार लोकांची दररोज वर्दळ असते, असे सांगून माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे की, सिडकोकडून उभारण्यात आलेल्या या मार्केटच्या बांधकामात सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी होत्या. मार्केटचे लोकार्पण झाल्यानंतर भिंतींमधून लोखंडी सळ्या बाहेर येणे, स्लॅबचे तुकडे कोसळणे यांसारख्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आयआयटीच्या अहवालाच्या आधारे नवी मुंबई महापालिकेने सुमारे २४ वर्षांपूर्वी हे मार्केट धोकादायक घोषित केले असून परिसरात त्याबाबतचे फलकही लावण्यात आले आहेत. दरम्यान, व्यापारी संघटनेने स्ट्रक्टवेल डिझायनर या खासगी संस्थेकडून केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काही गाळे वगळता इमारत सुरक्षित असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर व्यापारी संघटना आणि प्रशासन यांच्यात न्यायालयीन वाद सुरू झाल्याने पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला आहे. या मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने पुढाकार घेऊन व्यापाऱ्यांच्या संमतीने पुनर्बांधणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी, तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी पांडुरंग आमले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.



