भाजपच्या वतीने श्री वासुदेवेश्वर शिवमंदिरात आयोजन
उपमहापौर दशरथ भगत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते, नागरिक व व्यापाऱ्यांचा सहभाग
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाशीगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले. स्व. प्रेमनाथ पाटील चौक येथील श्री वासुदेवेश्वर शिवमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर तथा स्थानिक नगरसेवक दशरथ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगरसेवक निशांत भगत यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत, समाजसेवक संदीप भगत, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, ग्रामस्थ तसेच व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआरतीनंतर उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी नेतृत्वासाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना उपमहापौर दशरथ भगत म्हणाले की, देशसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात करून सलग ४ हजार ३९९ दिवस पंतप्रधान म्हणून कार्यरत असलेल्या नरेंद्र मोदी यांनी देशाला स्थिर आणि सक्षम नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली असून जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.
भारताच्या शेजारील अनेक देशांमध्ये तसेच आखाती प्रदेशात अस्थिर परिस्थिती निर्माण होत असताना, गेल्या १२ वर्षांत देशातील जनतेला स्थैर्य, सुरक्षितता आणि विकासाभिमुख वातावरण देण्यात मोदी यांचे नेतृत्व प्रभावी ठरल्याचेही भगत यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनावा, अशी प्रार्थना केली.

