मोदींच्या विक्रमी देशसेवा कार्यकाळाचा नवी मुंबईत गौरव; वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत महाआरती
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळत देशसेवेचा प्रदीर्घ आणि ऐतिहासिक कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील बोनकोडे येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विशेष पूजा, अभिषेक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारत अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र म्हणून पुढे जावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहावी, अशी प्रार्थनाही वनमंत्री गणेश नाईक यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी केली.
अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते सागर नाईक, नगरसेविका वैष्णवी नाईक, अदिती नाईक, ॲड. भारती पाटील, ॲड. सायली शिंदे, मीनाक्षी पाटील, नगरसेवक मुनावर पटेल, संदीप म्हात्रे, रविकांत पाटील, रॉबिन मढवी, माजी नगरसेवक लीलाधर नाईक तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी महाआरतीत सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर मिळविलेल्या यशाचा गौरव केला.
