अनंतकुमार गवई
अखिल भारतीय माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ शहराच्या प्रतिमेला सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरातील वाढत्या फेरीवाला अतिक्रमणामुळे तडा जात असल्याचा आरोप करत अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सानपाडा परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई शहराला स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देश व राज्य पातळीवर विविध पुरस्कार मिळत असले, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये अतिक्रमण आणि अस्वच्छतेची समस्या कायम असल्याचे आमले यांनी निवेदनात नमूद केले आहे. विशेषतः सानपाडा रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूंना, स्टेशनबाहेरील चौक, बधाई स्वीट्स परिसर, डायमंड डेअरी चौक तसेच अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवरील पदपथांवर वर्षभर फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. फेरीवाल्यांमुळे पदपथांवरून चालणे कठीण झाले असून वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेच्या समस्याही वाढल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत असले, तरी अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सानपाडा परिसरातील वाढता बकालपणा लक्षात घेता रेल्वे स्टेशन परिसरापासून संपूर्ण नोडमधील अंतर्गत व बाह्य रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी आमले यांनी केली आहे. तसेच जर या भागातील परिस्थितीत सुधारणा होत नसेल, तर स्वच्छता सर्वेक्षणामधून सानपाडा परिसर वगळावा, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि नवी मुंबईच्या स्वच्छ शहराच्या प्रतिमेला साजेशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा पांडुरंग आमले यांनी व्यक्त केली आहे.



