ए.एस.पी. शाळेबाहेरील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अपघाताची भीती वाढली
कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी वाहतूक विभागाला निवेदन
नवी मुंबई : घणसोली सेक्टर-९ येथील ए.एस.पी. शाळेबाहेर शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत दररोज निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. वाढत्या वाहतूक गोंधळामुळे भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वाहतूक विभागाकडे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मनसेच्या रस्ते आस्थापना विभागाचे नवी मुंबई शहर संघटक संदीप गलुगडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या खासगी रिक्षा, स्कूल व्हॅन, शाळेच्या बसेस, दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे संपूर्ण मुख्य रस्ता अडवला जातो. परिणामी, स्थानिक नागरिकांसह नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसलाही मोठा खोळंबा सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीमुळे परिसरात वारंवार वादावादी आणि भांडणांचे प्रकार घडत असून, दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थी पायी ये-जा करत असल्याने या गोंधळात एखादा दुर्दैवी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची गंभीर बाबही निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.
याशिवाय, शाळेजवळील सोसायट्यांमधील रहिवाशांनाही रोजच्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे समस्या अधिकच तीव्र झाली असून, स्थानिक नागरिक व पालकांनी वारंवार तक्रारी करूनही शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत वाहतूक विभागाने तातडीने योग्य नियोजन करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेचे घणसोली विभागाध्यक्ष विशाल चव्हाण यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक (वाहतूक) यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी मनसेचे घणसोली विभागाध्यक्ष विशाल चव्हाण, विभाग सचिव श्याम वाघमारे, उपविभागाध्यक्ष अक्षय नाईक, हरीश चव्हाण, शाखाध्यक्ष निलेश जाधव, विठ्ठल साळुंखे, प्रवीण भांबरे, चंद्रशेखर करंडे, उमेश काळे आणि हर्षद गाडगीळ उपस्थित होते.
