२१ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीला यश
महिला, शेतकरी आणि स्वयंसहाय्यता गटांच्या हितासाठी काम करण्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विश्वास
स्वयम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले. या यशाबद्दल शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत, हा विजय सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभावी नियोजन आणि रणनीतीमुळे सहकार पॅनलला घवघवीत यश मिळाले. निवडून आलेले संचालक ठाणे व पालघर जिल्ह्यातील महिला, शेतकरी, बचत गट आणि स्वयंसहाय्यता गटांच्या सक्षमीकरणासाठी प्राधान्याने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार, बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. शिंदे यांनी सांगितले की, सहकार पॅनलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा पाठिंबा लाभला होता. बँकेच्या सभासदांनी सहकार पॅनलवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
राज्यात सहकार चळवळ अधिक बळकट व्हावी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण व कृषी क्षेत्राची समृद्धी साधावी, या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत मार्गदर्शन व नियोजन केले. त्यांच्या रणनीतीमुळे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश जागा बिनविरोध झाल्या, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
वसई तालुक्यात सहकार पॅनलला एकहाती मतदान झाल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
आत्मपरीक्षण करा, खासदारांना शिव्या देण्यात वेळ घालवू नका – डॉ. श्रीकांत शिंदे
शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन टीका-टिप्पणी करण्यापेक्षा पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पक्ष का सोडत आहेत, याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे, असा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला लगावला.
“शिवसेना भगवा झेंडा उराशी बाळगून पुढे जात आहे. त्यामुळेच २०२४ च्या निवडणुकीत राज्यातील मतदारांनी शिवसेनेला भरघोस पाठिंबा दिला आणि विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. आता त्यांच्याकडे सकाळपासून रात्रीपर्यंत टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम उरलेले दिसत नाही,” असेही डॉ. शिंदे यांनी म्हटले.


