मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यात हानी
प्रशासनाला सतर्क करत नुकसानग्रस्त भागाची पाहणी
तातडीने पंचनाम्यांचे निर्देश
जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : जुन्नर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, पूल आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत पंचायत समिती सदस्य संजय वऱ्हाडी यांनी नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष धाव घेत ग्रामस्थांना धीर दिला. रस्त्यांवरील धोकादायक खड्डे बुजविण्यापासून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यापर्यंत त्यांनी सक्रिय भूमिका बजावत प्रशासनालाही तातडीने कामाला लावले.
मीना नदीवरील पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर संजय वऱ्हाडी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून दिवसभर पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे पुलावरील खड्डे तातडीने बुजविण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, वडज, गुंजाळवाडी, आर्वी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, वडगाव, सावरगाव बस्ती, निमदरी तसेच स्मशानभूमी परिसरातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीवरील पुलांचे कठडे वाहून गेले असून अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला, पिके आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
संजय वऱ्हाडी यांनी सार्वजनिक बांधकाम, कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पाहणी करण्याचे निर्देश दिले. तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकाऱ्यांना प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा पंचनामा तातडीने करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याने त्वरित पंचनामा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून संजय वऱ्हाडी यांनी दाखविलेली तत्परता आणि प्रशासनाशी साधलेला प्रभावी समन्वय यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. मीना नदीवरील पुलावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून संपूर्ण पंचायत समिती गणातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले आहेत.
“संकटात लोकांसोबत उभा राहणारा लोकप्रतिनिधीच खरा आधार असतो,” अशी भावना यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.