राष्ट्रवादीच्या नितीन चव्हाण यांचा नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दणका
श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
निकृष्ट सेफ्टी किटवरून अग्निशमन विभागाला धरले धारेवर
नवी मुंबई : नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आगीच्या भडक्यात स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्याच सुरक्षेशी नवी मुंबई महापालिका प्रशासन खेळत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. फायरमनच्या पायातील सेफ्टी बूट फाटलेले, आग प्रतिबंधक जॅकेटची दुरवस्था आणि सुरक्षेच्या साहित्याची झालेली हेळसांड यामुळे प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
“नागरिकांचे जीव वाचवणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या जीवाची महापालिका प्रशासनाला किंमत नाही का?” असा संतप्त सवाल नितीन चव्हाण यांनी उपस्थित केला. आग विझवताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर असणारे सुरक्षा साहित्यच जर फाटके आणि निकृष्ट असेल, तर महापालिका प्रशासन नेमके कोणत्या क्षणी जागे होणार, असा सवालही त्यांनी केला.
अग्निशमन कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सेफ्टी किटची दयनीय अवस्था समोर आल्यानंतर नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या दालनात धडक दिली. यावेळी उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांना जाब विचारत त्यांच्या कामकाजाबाबत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या साहित्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका नितीन चव्हाण यांनी मांडली. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी पुरुषोत्तम जाधव यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष तुषार कचरे, बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष अजय सुपेकर, मनपा कामगार सेनेचे अध्यक्ष संजय सुतार, संदीप मोहिते, विश्वजित भोईटे, राम पुजारे, केतन वालकर, महेश हेगडे आदी उपस्थित होते.
‘सात दिवसांत किट द्या, अन्यथा आंदोलन!’
नितीन चव्हाण यांनी प्रशासनाला थेट इशारा देत येत्या सात दिवसांत नवी मुंबईतील सर्व अग्निशमन केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना आवश्यक दर्जाचे नवीन सेफ्टी किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या साहित्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
अग्निशमन कर्मचारी आगीशी दोन हात करत असताना त्यांच्या सुरक्षेच्या साधनांवर पैसे वाचवण्याचा किंवा दिरंगाई करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो प्रकार संतापजनक असल्याचे नितीन चव्हाण यांनी सुनावले. “कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रशासनाचा कारभार चालणार असेल, तर त्याला विरोध केलाच जाईल,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या अग्निशमन कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही आता उपस्थित होत आहे. मात्र, या प्रकरणात कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुरक्षा साहित्य मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार नितीन चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
कोट
“निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे!”
“अग्निशमन कर्मचारी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या साधनांमध्ये निष्काळजीपणा झाला तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. कर्मचाऱ्यांना दर्जेदार सेफ्टी किट मिळेपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील.”
— नितीन चव्हाण
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार