जिल्ह्यातील वीज प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी सभागृहाला ठणकावले
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कोकणच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नावरून अत्यंत आक्रमक होत कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणला अक्षरशः धारेवर धरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा यंत्रणेची भीषण दुरावस्था ज्या आक्रमक शैलीमध्ये आमदार निलेश राणे यांनी मांडली. ती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोकणच्या प्रश्नांवर उघडपणे आमदार निलेश राणे यांचे जोरदार समर्थन केले. सत्ताधारी आणि विरोधकांनी कोकणच्या आणि सिंधुदुर्गच्या प्रश्नावर एकमत दर्शवले.
विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज समस्यांवरुन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले. विशेष म्हणजे त्यांनी या मांडलेल्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला.
आमदार निलेश राणेंनी लक्षवेधी सूचनेद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरणात असलेल्या अडचणी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हाल, वीजपुरवठ्याचा कमी दाब, आणि रखडलेले भूमिगत वीज प्रकल्प यावर आक्रमक होत सरकारला जाब विचारला. सभागृहात आक्रमक होत सिंधुदुर्गात वीज समस्या आहे, यावर सरकारने तोडगा काढला पाहिजे, असे आमदार निलेश राणे म्हणाले. तसेच महावितरण आणि ऊर्जा विभागाच्या कामकाजावर त्यांनी काही सवाल उपस्थित केले. या मुद्द्यावर शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही निलेश राणेंच्या मुद्द्याला उघडपणे पाठिंबा दर्शवला.
आमदार निलेश राणे यांनी विचारलेल्या प्रश्नामध्ये महावितरणमध्ये ९० टक्के कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांना कामाचे प्रशिक्षणही दिले नाही, असा आरोप केला. तसेच ‘गेल्या काही दिवसांपासून ११ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला आहे. पण कोणालाच मदत मिळाली नाही, महावितरण ठेकेदाराकडे बोट दाखवते आणि ठेकेदाराकडून नुकसान भरपाई घ्या’ असे सांगते असाही आरोप त्यांनी केला आहे. १५ वर्षांपासून भूमिगत वायर टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत. पण अद्याप काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे, यासाठी सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. मालवण हे पर्यटन क्षेत्र असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे भेट देत असतात मात्र तरी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार चार दिवस बत्ती गुल असते, असा गौतम स्पोर्ट करत आमदार निलेश राणे म्हणाले की, १९ आणि २० मे रोजी महाराष्ट्रात जो पाऊस झाला त्यातील सर्वाधिक पाऊस हा कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १९ ते २० स्थळांचे याबाबत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते माझ्या एकट्या कुडाळ मतदार संघात २०० विजेचे खांब कोलमडून पडले. त्याचा पंचनामाही अधिकाऱ्यांनी केला मात्र जेव्हा प्रत्यक्षात नुकसान भरपाईची वेळ आली. तेव्हा आम्हाला केवळ १६ विजेचे खांब देण्यात आले याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष वेधले.
निलेश राणे यांच्या प्रश्नावर पाठिंबा देताना भास्कर जाधव म्हणाले की, ‘सिंधुदुर्गात वीज प्रश्न गंभीर आहे’. राणेंनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे. तर ऊर्जा विभागातील ढिसाळ कारभाराला वेळीच आवर घालणे आवश्यक असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, “कुडाळ-मालवण वीज प्रश्नावर लवकरच बैठक आयोजित करून तोडगा काढला जाईल,” असे आश्वासन दिले आहे.



