जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव या ठिकाणी गेली दोन महिने विद्युत डीपीच्या नादुरुस्तपणामुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाचे तातडीने निवारण करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी पिंपळगावचे शेतकरी संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगावमध्ये महावितरणकडून विद्युत डीपीतील दोष दुर केला जात नसल्याने पिंपळगावातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यापासून शेताच्या पाण्यापर्यत विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दोन महिन्यापासून अधिक काळ असतानाही महावितरणकडून समस्येवर ठोस तोडगा काढला जात नसल्याने ऐन पावसाळ्यात शेतकरी व त्यांच्या परिवारावर घरातील पाण्यासाठीही व्याकुळ होण्याची वेळ आलेली आहे. विद्युत डीपीमध्ये असलेल्या तीन बॉटलपैकी एका बॉटलची समस्या असल्याचे सांगण्यात येते. ही बॉटल महिना-दिड महिने उपलब्ध होत नाही. सिंगल फेजवर मोटर जेमतेम चालते. तीन फेजवर मोटर चालत नाही. पिंपळगावातील वऱ्हाडी मळा व गावठाणातील अशा दोन विद्युत डीपीचा दोन महिन्यापासून सावळा गोंधळ सुरु आहे. गावातील युवक पोटापाण्यासाठी मुंबई व अन्य ठिकाणी असून गावामध्ये वयोवृद्धांचे प्रमाण अधिक आहे. वीज डीपीतील दोष निवारण होत नसल्याने शेतकरी परिवाराला अनेकदा पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. त्यांना मोटरीत सिंगल फेज जोडता येत नाही. पिंपळगावचे शेतकरी विद्युत डीपीच्या समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. पिंपळगावातील शेतकऱ्यांच्या विद्युत डीपीबाबत समस्येचे निवारण न झाल्यास मंत्रालयात येवून तुमच्या दालनासमोर मी ठिय्या आंदोलन करेल. माझ्या गावातील शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण शेतकऱ्यांच्या वीज डीपीबाबतच्या समस्या सुटल्या पाहिजेत. तुम्ही स्वत: या समस्येत लक्ष घालून शेतकऱ्यांची समस्या जाणून घ्या. महावितरणला जाब विचारा व समस्या सोडविण्याचे निर्देश देण्याची मागणी पिंपळगावचे शेतकरी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.



